मुंबई / नगर सह्याद्री –
मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून ४०० किलोच्या आरडीएक्सच्या स्फोटाद्वारे मुंबई शहर हादरवले जाईल, असे या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले आहे. १४ पाकिस्तानी भारतामध्ये घुसल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. ४०० किलो आरडीएक्सने आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामध्ये १ कोटी लोकांचा मृत्यू होईल असा दावा देखील करण्यात आला आहे. ३४ गाड्यांमध्ये आत्मघाती बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली.
धमकीच्या मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की ‘लष्कर-ए-जिहादी’ म्हणून ओळख असलेल्या एका गटाने या धमकीची जबाबदारी स्वीकारली आहे. १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच भारतात घुसले आहेत असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत आणि राज्यभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व बाजूने तपास केला जात आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका ४३ वर्षीय व्यक्तीला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश मधुकर रणपिसे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पोलिस हेल्पलाइनवर फोन करून कळवा रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. नंतर पोलिसांनी याचा तपास करत आरोपीला अटक केली आणि हा धमकीचा फोन खोटा असल्याचे सांगितले.