संगमनेर । नगर सहयाद्री :-
राज्यातील सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विचारवंत आणि जनतेकडून तीव्र निषेध होत आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल, कृषी, शिक्षणमंत्री राहिले असून, सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रमुख २१ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी संगमनेर तालुक्यासह राज्यभरात संयमित आणि सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण मांडले आहे. मात्र, एका समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कीर्तनकार बापू भंडारे यांनी थोरात यांच्याबाबत बेताल वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकारामुळे संगमनेरसह राज्यभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संगमनेर तालुक्यात शांतता व सर्वधर्म समभावाचा वारसा आहे. या तालुक्याचा विकास, शिक्षण, सहकार व कृषी क्षेत्रातील प्रगती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याचा विकास मोडण्याबरोबर अशांतता निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करीत आहेत.
या प्रकाराचा महाराष्ट्र वारकरी संप्रदाय, संत तुकाराम वारकरी मंडळ, आध्यात्मिक सेवा संघ, पुरोगामी संघटना, साहित्यिक, विचारवंत, तसेच महाविकास आघाडीतील पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आदींनी निषेध केला आहे. ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवरून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, रोहिणी खडसे, तसेच अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यावर आरोप होणे म्हणजे महाराष्ट्राच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. हे राज्य हे कधीच सहन करणार नाही.
-खासदार सुप्रिया सुळे
स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या व्यक्तीकडून अशी धमकी म्हणजे ‘मुखी राम, मनात नथुराम’ असाच प्रकार आहे.
-खासदार अमोल कोल्हे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे असे व्यक्तिमत्त्व आहे की विरोधकही आदराने त्यांचा उल्लेख करतात. अशी वक्तव्ये अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेत.
– खासदार निलेश लंके
संगमनेरात गुरुवारी निषेध मोर्चा
राज्याचे सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संगमनेर शहरात भव्य विराट निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी दिली असून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.