spot_img
ब्रेकिंगघार्गे साहेब, स्मार्ट पोलिसिंग कधी?, गुन्ह्यांची उकल का थांबली? 19 हजार गुन्हे...

घार्गे साहेब, स्मार्ट पोलिसिंग कधी?, गुन्ह्यांची उकल का थांबली? 19 हजार गुन्हे प्रलंबित ही भूषणावह बाब नक्कीच नाही!

spot_img

अवैध धंद्यांसह वाळू तस्करी सुस्साट | गावठी पिस्तुलांचा बाजार भरणेच बाकी राहिलेय!
सारिपाट / शिवाजी शिर्के
पोलिस अधीक्षक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर सोमनाथ घार्गे यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चुटकीसरशी माग लावला आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पोस्टींग दिल्या. मात्र, सोयीने आणि मजने बदली मिळाल्यानंतर हे अधिकारी आणि कर्मचारी त्या- त्या पोलिस ठाण्यात काम करताना कोणाशी लगट करुन बसलेत हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा असताना हे धंदे सुसाट सुटले आहेत. गुन्हेगार सुसाट सुटले आहेत. गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत आणि घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात देखील पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होण्याची कोणतीच चिन्हे दिसून यायला तयार नसल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा गुन्हेगारांवर वचक मिळविण्याचा दावा त्यांच्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोल ठरविण्याचा विडा उचलला आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.

पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेताच सोमनाथ घार्गे यांनी क्राईम मिटींगमध्ये प्रलंबीत गुन्ह्यांचा तपास करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला बहुतांश पोलिस ठाण्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे आकडेवारीवरुन तरी स्पष्टपणे समोर आले आहे. जनतेला अपेक्षीत असणारे पोलिसींग किती पोलिस ठाण्यात होते यावर सोमनाथ घार्गे यांनी अभ्यास केला तर धक्कादायक बाबी समोर येतील. जहागीरी मिळाल्यागत कलेक्शन करण्यात काही पोलिस ठाणी आणि त्यांच्यातील काही खाकीतील गुंड धन्यता मानू लागले आहेत. झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यापेक्षा कलेक्शन कसे मिळेल आणि त्यातून कमाई कशी होईल यावर काही पोलिस ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भर दिला असल्याचेही लपून राहिलेले नाही.

मनमाड महामार्गावर माऊली प्रकल्प चालविणाऱ्या डॉ. धामणे यांच्यासोबत गुंडाला लाजवील अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस दलाची मान उंचावली आहे की काय असा उपरोधीक प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील डीबी पथक म्हणजेच गुन्हे शोध पथक हा तर मोठा विनोद झाला आहे. डीबीच्या पथकात नियुक्ती मिळावी यासाठी टेंडर भरले जात असल्याचे वास्तव सत्य देखील पोलिस अधीक्षकांनी समजून घेण्याची गरज आहे.

पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्यासह गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे काम डीबीच्या माध्यमातून होणे अपेक्षीत असते. मात्र, हे डीबी पथक त्याच गुन्हेगारांसोबत पाट झोडत असेल तर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मजनुसार पोस्टींग दिली असताना त्यांच्याकडून चांगले काम होण्याची अपेक्षा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी ठेवली असेल तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, त्यानुसार काम होत नसेल आणि पोलिस ठाण्यात आलेल्या पिडीत व्यक्तीला न्याय मिळणार नसेल तर पोलिस अधीक्षक या नात्याने अशा कलंकीत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा दंडुका सोमनाथ घार्गे यांना घ्यावा लागणार आहे. तसे होणार नसेल तर नगरची जनता समजदार आहे, त्यातून वाट्याला येईल ती फक्त आणि फक्त बदनामी!

प्रलंबीत गुन्ह्यांची संख्या 19 हजार 400 पेक्षा जास्त असल्याचे आकडेवारी सांगत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, सर्व प्रकारच्या चोऱ्या, वाहन चोरी, अमली पदार्थ विक्री, शस्त्र, दारूबंदी, फसवणूक, आकस्मिक मृत्यू यासारख्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा विचार केला तर 30 पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे शोध म्हणजेच डीबी पथके कार्यरत आहेत. या पथकात पाच ते दहा कर्मचारी काम करतात. गुन्ह्यांची उकल होण्यासाठी हे पथक आवश्यक आहेच. मात्र, त्यांच्यातील काही जणांकडून कोणासाठी कितीचे कलेक्शन होते याचा शोध घेण्याचे काम टीम कॅप्टन या नात्याने पोलिस अधीक्षकांना करावे लागणार आहे.

नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाईगिरी आणि टपोरीगिरी करणाऱ्या टोळ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही. ही संख्या वाढतच चालली आहे. त्यांच्या हातात आता गावठी कट्टे देखील दिसू लागले आहेत. पोलिसांनी गेल्या दीड वर्षात तब्बल 180 कट्टे जप्त केले आहेत. ही आकडेवारी पोलिसांसाठी भुषणावह नक्कीच नाही. जिल्ह्यात गावठी पिस्तुल खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. मध्यप्रदेश राज्यातील उंबरठी, लालबाग कामठी, बडवाणी, सैथवा येथून गावठी पिस्तूल आणून ते पाच ते पंचवीस हजार रुपयांमध्ये विकले जातात. वाळू तस्करांकडे तर हे कट्टे खेळण्यासारखे दिसून येत आहेत. कट्ट्यांचा हा बाजार आणि त्यातून होणारी दहशत यावर काम करण्याची गरज असताना पोलिस दल आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही.

स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्हाभर गावठी पिस्तुलाच्या अनुषंगाने कारवाई होत असताना स्थानिक पोलिस ठाण्यातून याबाबत काहीच आक्रमक भूमिका दिसून येत नाही. एलसीबीने कितीही गावठी पिस्तुले पकडली तरी ही पिस्तुले येतात कोठून आणि त्याचा मास्टरमाईंड कोण याचा छडा लावण्याची गरज आहे. पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेऊन आता सोमनाथ घार्गे हे स्थिरस्थावर झाले आहेत. जिल्हा त्यांना नवीन नाही. मात्र, टीममधील बदमाश शोधून त्यांच्यावर धाक निर्माण करण्यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे. पोलिस दलाची शान आणि खाकी वदची उंची वाढविण्याचे मोठे आव्हान पोलिस अधीक्षक या नात्याने घार्गे यांच्यासमोर सध्या तरी दिसून येत आहे. त्यावर ते कशी मात करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. सामान्य जनतेला अपेक्षीत असणारे स्मार्ट पोलिसींग घार्गे यांच्याकडून दिसण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट’; महत्वाचा विषयावर चर्चा..

संगमनेर । नगर सहयाद्री:- राज्यातील शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार...

शिवसेना आक्रमक! आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातय का? शहराची दैनावस्था, पहा कोण काय म्हणाले?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मध्य शहरास बाजारपेठ एकाच वेळेला चोहोबाजूंनी खांदून ठेवत ऐन पावसाळ्यात...

जुगार अड्ड्यांवर छापेमारी!, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | नगर सह्याद्री  शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल...

वारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये भयंकर प्रकार; महाराजांसह पाच जणांनी पालकांना खोलीत कोंडल अन्..

बीड । नगर सहयाद्री:- बीड जिल्ह्यातील तपभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थानात महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी...