जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना
जामखेड | नगर सह्याद्री
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव येथे सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले (वय-२५) या तरुण आईने आपल्या दोन मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मरण पावलेल्यांमध्ये रूपाली उगले यांच्यासोबत मुलगा समर्थ उगले (वय-०५) आणि मुलगी चिऊ उगले (वय-०३) यांचा समावेश आहे. पती नाना उगले, पत्नी रूपाली, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जण घरात राहत होते. मुलगा शाळेतून आल्यावर सायंकाळी रूपालीने गणवेशातच मुलाला व लहान मुलीस विहिरीवर नेले आणि रूपाली हीने एकत्रितपणे पणे आपल्या मुलांसह विहिरीत उडी मारली. त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर पती व सासरे शेतातून घरी आले तेव्हा त्यांना सौ. रूपाली व दोन्ही मुले घरी दिसून आली नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता शेजारील विहिरीच्या वर चपला दिसून आल्या. यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बोरीच्या काटाड्या टाकून रात्री उशिरा तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सपोनि उज्ज्वल राजपूत आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आणि माहेर कडील नातेवाईक दाखल झाले. मृतदेहांना विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, खर्डा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. नेमके प्रकरण काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित झाला असून चर्चेला उधाण आले आहे.