Maharashtra Weather: काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार, दिनांक १२ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून, पुढील आठवडाभर काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवार १२ जून ते सोमवार १६ जून या कालावधीत कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः शनिवार १४ जून ते सोमवार १६ जून या तीन दिवसांत या भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग, सातारा, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या १३ जिल्ह्यांत पुढील आठ दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित ११ जिल्ह्यांत सध्या केवळ मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि मुंबईमध्ये मान्सून पोहोचला असला तरी त्याची प्रगती सध्या थांबलेली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश भागात मान्सून पोहोचायचा बाकी आहे. मात्र गुरुवारपासून वातावरण मान्सूनसाठी अनुकूल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या काही शेतकरी धूळ पेरणीच्या विचारात आहेत. मात्र, मान्सून सक्रिय होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. रविवार १५ जूननंतर ओलावा व वाफसा योग्य झाल्यास पेरणीसाठी योग्य वेळ येईल. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा. पूर्वमोसमी पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये, कारण येणारा पाऊस त्यांच्या पेरण्या मार्गी लावू शकतो.