संगमनेर । नगर सहयाद्री:-
राज्यातील शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आमदार किरण सरनाईक, आमदार जयंत आसगावकर आणि आमदार किशोरभाऊ दराडे हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्राशी निगडित काही अत्यंत महत्त्वाचे आणि दीर्घकाल प्रलंबित विषय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या चर्चेत मुख्यत्वे चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी तातडीने निधीची तरतूद करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा होता. शिक्षण संस्थांमधील कर्मचारी अनेक वर्षांपासून या मागणीसाठी संघर्ष करत आहेत, परंतु अद्याप निर्णय झालेला नाही.
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आयटी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना मान्यता देऊन त्यांना शासकीय अनुदान जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. आधुनिक युगात आयटी शिक्षण अनिवार्य असतानाही या विषयाच्या शिक्षकांना अद्याप अनुदान न मिळाल्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रत्येक बाबीचा गांभीर्याने विचार करून लवकरच योग्य त्या निर्णयासाठी प्रयत्न केले जातील, असे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आवाज देणं ही माझी जबाबदारी आहे. शासन दरबारी या प्रश्नांवर ठामपणे पाठपुरावा करत राहणार असून, यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे,अशी प्रतिक्रिया आ. तांबे यांनी दिली.