चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
अहिल्यानगर| नगर सह्याद्री
मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून जनतेला अडचण निर्माण झाली आहे. परंतु कामे करीत असताना ठेकेदाराला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता एकदा काम केल्यानंतर पुन्हा ते करण्याची गरज भासणार नाही, थोडे दिवस त्रास सहन करा कायमस्वरूपी चे प्रश्न मार्गी लागले जातील. परंतु, काही राजकीय स्वयंघोक्षित पुढारी कामांवर टीका करतात. मी महापालिका, विधानसभा, लोकसभा अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका लढविल्या आहेत. ज्यांना समाजामध्ये किंमत नाही त्यांना जास्त महत्त्व दिले नाही. महाराष्ट्रात असे वाचाळवीर लोक आहेत. त्यांच्याकडे जनता मनोरंजनाने पहात असते असे सांगत आमदार संग्राम जगताप यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.
चाणय चौक आदर्श कॉलनी येथे माजी सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, डॉ. बलराज पाटील, सीए अशोक पितळे, अभय कांकरिया, संजय ताथेड, राजू शेटिया, बाळू धाडीवाल, संजू गुंदेचा, किशोर डागा, सावन गुगळे, संदीप शिंगवी, डॉ. अजय देशमुख, प्रतीक पाचपुते, विशाल दाभाडे, दिनेश भंडारी, गौरव झवर आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.
आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. या कार्यकाळात शहर विकासासाठी एवढा मोठा निधी कधी मिळाला नव्हता, मंजूर करून आणलेली विकास कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही राजकीय स्वयंघोषित पुढारी या कामांवर टीका करत आहेत, तर त्यांचे कामच असते विरोध करणे आणि टीका करणे. काल्पनिक चित्र उभा करून बोलत राहणे तरच ’ते’ लोकांना आकर्षित करू शकतात, पण तशी परिस्थिती राहिली नाही. आता नगरकर ही हुशार झालेले आहे. शहरातील कॉलनीपासून ते डीपी रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निधी आणला आहे. उपनगरातील बहुतांश रस्त्यांची कामे राज्य शासनाच्या निधीमधून पूर्ण देखील झाली आहेत. काही कामे करायची बाकी आहेत. ती देखील मंजूर आहेत, असे आमदार जगताप म्हणाले.
राजाभाऊ कोठारी म्हणाले की, पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवत असतात आणि जात असतात. त्यामुळे विरोधांकडे लक्ष न देता शहर विकासाची कामे मार्गी लावावीत. आमदार संग्राम जगताप यांनी विकासाचा रथ सुरू केला आहे. त्या रथाचा वेग मंदावता कामा नये. शहरामध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत त्याचा त्रास आपल्याला होत आहे, तो त्रास काही दिवस सहन करायचा आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे शहर बदलत असून त्या विकास कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. यावेळी सीए अशोक पितळे म्हणाले की, आम्ही लहान असताना शहरांमध्ये कुठलेही काम नव्हते मात्र! आमदार संग्राम जगताप यांनी पुढील ५० वर्षाचे काम केले आहे.
विकासाचा वेग टिकवून ठेवणे
नागरिकांच्या हाती ः आ. जगताप
शहरात चांगले काम करणारी नगरसेवकांची टीम आहे. त्या माध्यमातून नागरिकही समाधानी असून विकास कामावर बोलू लागली आहे. ते ऐकायला मिळत असून विकसित नगर निर्माण होत आहे. ही जनभावना निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होणार असल्याने इच्छुकांच्या संख्या देखील वाढल्या आहेत. आता कार्यक्रमाला दिसायला लागले आहे. हे लोक पाच वर्षे गायब असतात. जर वेगळ्या विचाराचे लोक आले तर शहर विकास थांबला जाईल. यासाठी अशा लोकांना बाजूलाच ठेवले पाहिजेत विकासाच्या गाड्याला जो वेग आला आहे तो टिकून ठेवण्याचे काम नागरिकांच्या हातात आहे. अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
कांकरिया, मुनोत पथ
आदर्श कॉलनीतील दोन्ही रस्ता काँक्रिटीकरणाची कामे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहेत. या दोन्ही रस्त्यांना कुंदन कांकरिया व राजेंद्र मुनोत पथ असे नामकरण करायचे आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याची कामे प्रलंबित होती ती आता मार्गी लागत आहेत. त्यामुळे कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी व्यक्त केले.