Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असेल आनंदच असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांची (शरद पवार) विचारधारा नेमकी काय आहे हे त्यांनाच विचारावं लागेल कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे हेच मला माहित नाही असेही ते म्हणाले.
सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीनंतर ना. विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे. आणि आता जर ते एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घ्यावा असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करावं, किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादी विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. दरम्यान त्यांची विचारधारा नेमकी काय आहे हे त्यांनाच विचाराव लागेल कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे हेच मला माहित नाही असेही ते म्हणाले.
सिंचन भवन येथील बैठकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते, त्यांना शरद पवार यांच्या विधनाबाबत विचारले असता त्यांनी सोलापूरचे आम्ही चार आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तसेच पवार साहेबांना पण याविषयी बोलणे झाले होते, असे ते म्हणाले.