नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण आग लागली होती. या घटनेमध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये लष्कराचे जवान महेंद्र मेघवाल यांचा देखील समावेश आहे. ते दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबीयांसोबत घरी जात होते. या दुर्घटनेत फक्त जवानाचा मृत्यू नाही झाला तर त्यांची पत्नी आणि ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचही जण जिवंत जळाले. या घटनेमुळे मेघवाल कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महेंद्र मेघवाल हे बायको पार्वती, दोन मुली आणि एका मुलासोबत गावी जात होते. ते जोधपूर जिल्ह्यातील सेतवारा क्षेत्रामध्ये असणाऱ्या लवारन गावातील रहिवासी होते. ते जैसलमेरमधील दारू गोळा डेपोमध्ये कार्यरत होते आणि इंदिरा कॉलनीमध्ये कुटुंबीयांसोबत भाड्याने राहत होते. मंगळवारी ते पत्नी आणि मुलांसोबत जोधपूरला जात होते. पण कुणालाच माहिती नव्हते की कुटुंबासोबतचा हा प्रवास त्यांचा अखेरचा ठरेल.
थैयत गावाजवळ अचानक ते प्रवास करत असलेल्या बसला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. एसी बस असल्यामुळे आणि दरवाजे लॉक झाल्यामुळे कुणालाच बाहेर पडता आले नाही. बसमधील अनेक प्रवासी या आगीमध्ये जिवंत जळाले. यामध्ये जवानाच्या ५ जणांच्या कुटुंबातील सर्वजणांचा मृत्यू झाला. डीएनएन सॅम्पलद्वारे जवानाच्या कुटुंबीयांची ओळख पटवण्यात आली आहे.
जैसलमेर ते जोधपूरदरम्यान ही बस धावते. ज्या बसला आग लागली त्यामधून प्रवास करणाऱ्या २१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दिवाळीपूर्वीच अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे. ज्वलनशील पदार्थामुळे ही आग लागल्याचा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे.