अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाने तरुणीचा मानसिक छळ करत तिला आणि कुटुंबीयांना पिस्तुलाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित २७ वर्षीय तरुणी ही वाणी नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. २०१७ साली ओमकार ज्ञानेश्वर सुपेकर याच्याशी तिची ओळख झाली होती. काही काळ मैत्रीचे नाते असले तरी २०२० पासून ओमकारने तिला जबरदस्तीने लग्नासाठी त्रास देणे सुरू केले. तरुणीने प्रस्ताव नाकारताच आरोपीने तिला शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर तो विविध नंबरवरून कॉल करत त्रास देत असे. त्याने पिस्तुल हातात घेतलेल्या फोटोंद्वारे लग्न कर, नाहीतर परिणाम वाईट होतील असे मेसेजही बीहिणीच्या मोबाईलवर पाठवले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
व्यावसायिकाने विकत घेतलेले घर बँकेने लिलावात काढले
शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १० लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जबाजारी घर विकत घेतल्याचा प्रकार घराच्या लिलावानंतर उघडकीस आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संतोष कचरू साळुंके (रा. भूषण नगर, केडगाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश रामदास गोरे (वय ३७, रा. संदेशनगर, पाईपलाईन रोड) यांनी फिर्यादी दिली. त्याच्या माहितीनुसार, साळुंके याने तपोवन रोड येथील घर विक्रीस काढले होते. दोघांमध्ये १० लाख २० हजार रुपयांत व्यवहार ठरला. गोरे यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजी ७ लाख ४२ हजार रुपये रोख, तर २ लाख ७८ हजार रुपये फोन-पे द्वारे साळुंकेला दिले. त्याच दिवशी खरेदीखतही करण्यात आले, ज्यासाठी गोरे यांनी ६१ हजार २०० रुपये खर्च केला. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी घराचा ताबा दिला जाणार होता. मात्र, साळुंके याने सातत्याने ताबा देण्यास टाळाटाळ केली. सहा महिने उलटूनही काहीच हालचाल न झाल्याने गोरे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला. तेव्हा साळुंके याने मी सरकारी नोकर आहे, सर्व कर्ज फेडून ताबा देतो, असे सांगून गोरे यांचा विश्वास संपादन केला. पण जेव्हा गोरे घराचा ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा घरावर एका बँकेचे ४३ लाख रुपयांचे कर्ज थकबाकीची नोटीस लागलेली दिसली. यामुळे मोठा धक्का बसले. पुढे माहिती घेतल्यावर समजले की, साळुंके याने कर्ज न फेडल्याने बँकेने घर लिलावात काढले, आणि गोरे यांचे सर्व पैसे बुडाले. शेवटी फसवणुकीची जाणीव झाल्यावर गोरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मद्यधुंद अवस्थेत बस चालवणारा जेरबंद
शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत प्रवासी घेऊन बस चालवणाऱ्या एका चालकास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश हरीभाऊ कंद (वय २९, रा. वैष्णवी नगर चौक, केडगाव) असे या बसचालकाचे नाव असून, त्याच्यावर सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार चौक परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एमएच १६ सीसी ६३२५ क्रमांकाची शहर बस थांबलेली दिसली. त्या बसभोवती जमलेल्या नागरिकांनी बसचालकाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत चालक गणेश कंद हा दारूच्या नशेत बस चालवत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले असता, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट केले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीचा वादात पत्नीलाच मारहाण
पतीचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील भोसले आखाडा परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा अजहर सय्यद (वय २५, रा. मंडाबाई चाळ, भोसले आखाडा) यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, अश्विनी मल्लिकार्जुन कोळी आणि तिच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयेशा सय्यद यांचे पती अजहर सय्यद यांचा आरोपी अश्विनी कोळी व तिच्या साथीदारासोबत वाद सुरू होता. वादाचा आवाज ऐकून आयेशा खाली येताच, त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर दोघांनी मिळून आयेशा आणि अजहर सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहेत.