अहिल्यानगर | नगर सह्याद्री
माहेरुन मुलीच्या भविष्यासाठी पाच लाख व घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यासाठी सासरी विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर येथील वाघ मळा, बालिकाश्रम रोडवरील पल्लवी राजेश गुंजाळ (वय 35) यांनी आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पल्लवी यांनी पती राजेश छबुराव गुंजाळ, सासरे छबुराव रावजी गुंजाळ, सासू कांता छबुराव गुंजाळ, दीर अमोल छबुराव गुंजाळ (सर्व रा. प्रतिमा कॉलनी, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) आणि नणंद ज्योती निकेतन वाळे (रा. तहसील कार्यालय, नंदुरबार) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
फिर्यादीत म्हटले की, 25 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचा राजेश गुंजाळ यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीचे सहा महिने ठीक गेले, परंतु नंतर सासू कांता यांनी माहेरहून मानपान आणि कमी वस्तू मिळाल्याचा जाब विचारत छळ सुरू केला. सासरच्या इतर मंडळींनीही तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. मुलबाळ न झाल्याने टोमणे मारले. नणंद ज्योती वाळे यांनीही अपमान केला. पती राजेश यांनी दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच घराबाहेर काढले. मुलगी झाल्यानंतर मुलीच्या जन्मावर नाराजी व्यक्त करत मुलगा हवा होता असे सांगून राजेशच्या दुसऱ्या विवाहाची धमकी दिली.
असह्य त्रासामुळे पल्लवी मुलीसह माहेरी निघून गेल्या. सासरच्या मंडळींनी चार महिन्यांत संपर्क न साधल्याने त्या माहेरच्या मंडळींसह सासरी गेल्या, तेव्हा त्यांना घरात घेण्यास नकार देण्यात आला. तसेच, मुलीच्या भविष्यासाठी 5 लाख आणि घरबांधणीसाठी 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत शिवीगाळ आणि धमकी दिली. पल्लवी यांनी यापूर्वी भरोसा सेलकडे तक्रार केली होती, परंतु समेट न झाल्याने त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दाखल केली. सफौ रमेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.