मुंबई । नगर सहयाद्री:-
मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर परिसरात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. चाळ क्रमांक 37 मध्ये घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तीन मजली चाळ क्षणात कोसळली. या दुर्घटनेत १२ ते १५ जण मलब्याखाली अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आठ अग्निशमन गाड्यांसह बचाव पथक घटनास्थळी कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5:56 वाजता चाळ कोसळली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मलब्याखालून आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे इमारतीचा काही भाग क्षणात कोसळला. स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण चाळच मातीस मिळाली.
मुंबई पोलीस, अग्निशमन विभाग व BMC च्या मदत आणि बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्री व मानवबलाचाही वापर सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारत नगर परिसरात घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे. नातेवाईकांचे आक्रोश, मदतीसाठी आरडाओरड, आणि ढिगाऱ्यातून जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना घटनास्थळी तणावाचं वातावरण आहे.