Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवर दाखल झालेत. रात्री दोन वाजता मनोज जरांगेंचं पारनेरमध्येही जंगी स्वागत करण्यात आलं. हजारो मराठा बांधवासह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
29 ऑगस्टला केवळ एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्याने मैदानाच्या क्षमतेनुसार केवळ 5000 आंदोलकांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.
मराठा मोर्चामुळे पुणे जिल्ह्यात आज वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. वाहतूककोंडी होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत, नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगरमार्गे वळवली जाणार आहे. नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.