दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिकेने निवडणूक प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ समोर आला असून अनेकांची नावे दुबार आढळणे, काहींची नावे पूर्णतः गायब होणे तर तब्बल २५ ते ३० हजार मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकणे असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. या गोंधळासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादी वेळेत प्रसिद्ध व्हायला हवी होती; मात्र महानगरपालिकेने तब्बल ४८ तास उशिराने फोटोसह यादी जाहीर केली. या याद्यांमध्ये तब्बल १०,७५४ मतदारांची नावे दुबार असल्याचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. अनेक नोंदींना फोटो नसल्याने पुनरावृत्ती नावे ओळखणे कठीण झाले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची यंत्रणा खाजगी व्यक्तींकडे दिली गेली. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे मतदार यादी तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आणि यामुळेच प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला मेलद्वारे तक्रार केली आहे.
मतदार याद्यांमध्ये नावे चुकीची टाकणे, अनेकांची नावे पुनरावृत्ती, नागरिकांना वेळेवर याद्या न देणे, आयोगाच्या नियमांचे पालन न करणे असे गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. हरकती स्वीकारताना देखील आयुक्तांनी ठेकेदाराकडून सोशल मीडियावर “हरकती कशा द्याव्यात” अशा सूचना देऊन नियमांची पायमल्ली केली आहे.
सध्या २५ ते ३० हजार मतदारांची नावे अदलाबदल झाल्याची शक्यता असल्याने नागरिकांचा मतदानाचा हक्क धोक्यात आला आहे. मतदार याद्यांतील गंभीर गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना आपली नावे तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी हेराफेरी, नावांची अदलाबदल आणि नियम भंगाबद्दल संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी भुतारे यांनी केली आहे.



