सुजय विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरांतसह सत्यजित तांबेंवर थेट हल्ला
संगमनेर । नगर सहयाद्री:-
मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है, स्टेजपर बैठे 31 अभी भी तुमपे भारी है अशी तुफान टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली. विशेषतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्याविरोधात त्यांनी थेट हल्ला चढवला. संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐन थंडीत राजकीय तापमान वाढले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भाजप नेते व माजी खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. संगमनेरच्या मतदारांनी परिवर्तनाची दिशा आधीच निश्चित केल्याचा दावा करत, आता नगरपालिकेतही मोठे राजकीय बदल घडवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला चांगली गर्दी उसळली होती. लोकांच्या उपस्थितीमुळे सुजय विखे उत्साहात बोलताना दिसले. संगमनेर माझं आवडतं ठिकाण आहे. इथे आलो की माझ्यात वेगळा उर्जेचा संचार होतो, अशा शब्दांत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. काही लोकांनी माझ्या शांत भूमिकेचा वेगळा अर्थ लावला. पण आता मैदानात उतरलो असून या शहराच्या विकासासाठी मी थांबणार नाही, असे सुजय विखे यांनी जाहीर केलं. संगमनेरमधील काही निवडक लोकांनी आपापसात सत्ता वाटून घेत नगरपालिकेला सेवा समिती ऐवजी मेवा समिती बनवल्याचा आरोपही त्यांनी स्पष्टपणे केला. मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है, स्टेजपर बैठे 31 अभी भी तुमपे भारी है, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
विखे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या उमेदवारांच्या बाजूने उभे राहत, भाजप-शिंदे गटाची एकजूट अधिक दृढ असल्याचा संदेश दिला. इथे सिंहांच्या बोर्डावर अभिमान केला जातो, पण वाघाची ताकद वेगळीच असते. सिंह आणि वाघ यांच्या लढाईत शेवटी वाघच जिंकतो, असे म्हणत त्यांनी स्वतःच्या क्षमतेचे उदाहरणही दिले. सुजय विखे यांना रोखण्यासाठी अजून कुणी जन्मलंच नाही, अशा शब्दांत त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास जाहीर केला. त्याचबरोबर स्थानिक नेते अमोल खताळ यांच्याशी असलेलं राजकीय सहकार्यही त्यांनी अधोरेखित केले. अमोल खताळची इमारत असेल तर त्या इमारतीचा भक्कम पाया रचणारा मीच आहे, असा सूचक दावा त्यांनी करून प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवल्या.
संगमनेरला विकासाची नाही तर स्थिरतेची सर्वात जास्त गरज असल्याचे मत व्यक्त करताना विखे म्हणाले की, अनेक दशकांच्या सत्तेनंतरही शहरासमोर गटारी, कचऱ्याचे ढीग, भटक्या जनावरांची समस्या कायम आहे. चार दशकांचा स्वर्ग म्हणजे हा कचऱ्याचा डोंगर ? असे विचारत त्यांनी थोरात गटाला थेट उद्देशून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात मर्यादित कालावधीत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातच शहराच्या विकासाची दिशा बदलण्याची सुरुवात करण्यात आली. नगरपालिकेचा कारभार मिळाल्यास पुढील चार वर्षांत संगमनेरचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शेवटी मतदारांना आवाहन करत सुजय विखे म्हणाले की, विरोधक कितीही व्यक्तिगत हल्ले करत असले तरी त्याला उत्तर विकासातूनच दिले जाईल. नगरपालिकेत सत्ता द्या, आणि संगमनेरला खऱ्या अर्थाने 2.0 बनवू. व्यक्तीगत आरोपांनी शहराचा बदल होणार नाही. तुमचा विश्वास आमच्यावर आहे आणि आम्ही त्याला तडा जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे शिंदे-भाजप युतीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले. आता या भाषणाचा नगरपालिकेच्या निवडणुकीतील निकालांवर काय परिणाम होणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.



