spot_img
महाराष्ट्र“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”, उद्धव ठाकरे आक्रमक; पत्राद्वारे सरकारला विचारले ‘हे’...

“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”, उद्धव ठाकरे आक्रमक; पत्राद्वारे सरकारला विचारले ‘हे’ पाच महत्वाचे सवाल

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच या समितीच्या अहवालानंतर आणि ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. मात्र, तूर्तास तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.

दरम्यान, यावरूनच आता माजी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत सरकारला एक पत्र लिहित ‘शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा’, अशी मागणी केली आहे. तसेच खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? यासह पाच महत्वाचे प्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्राच्या माध्यमातून सरकारला विचारले आहेत.

उद्धव ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं?
“शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!, कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील का?”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी काही सवाल विचारले आहेत.

‘समिती नेमकी कसला अभ्यास करून अहवाल देणार?’
“शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?”, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारले आहेत.

‘ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा…’
“इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी ‘योग्य वेळ’ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर नगराध्यक्षपदासाठी काथ्याकूट! महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का? नगराध्यक्षपदासाठी जायदा शेख, विद्या गंधाडे यांना संधी

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपदाच्या...

नगरच्या व्यापाऱ्याला १९ लाखांचा गंडा! गुटखा जप्त, हातमापुरात महिलेस मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम..

सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक परस्पर विकले / ​एमआयडीसी पोलिसांत भोपाळ, बुलढाणा, राजस्थान येथील...

‘नगर बाजार समितीचा कारभार अक्षय कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली चालणार’

माजी सभापती भानुदास कोतकर; बाजार समितीत स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अहिल्यानगर | नगर...

नगरमध्ये ठाकरे सेनेला भाजपचा झटका; महापालिका निवडणूक! माजी उपमहापौरांसह चार नगरसेवक घेणार हाती कमळ!

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षबांधणीचे काम...