अहिल्यानगर । नगर सहयाद्री
राज्य शासनाच्या गृह विभागाने केलेल्या बदल्यामध्ये अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या (पोलीस उपअधीक्षक) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी देखील जिल्हा पोलीस दलात खांदेपालट केली. त्यांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नेवासा, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत.
अहिल्यानगरचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची बदली शिर्डी विभागाच्या उपअधीक्षकपदी करण्यात आली असून शिर्डीचे उपअधीक्षक शिरीष वमने यांची बदली रिक्त असलेल्या अहिल्यानगर ग्रामीणच्या उपअधीक्षकपदी करण्यात आली आहे. शीरामपूर विभागाचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांची बदली मंगलवेढा (जि. सोलापूर) विभागाच्या उपअधीक्षकपदी करण्यात आली असून त्यांच्या जागी अमरावती शहर येथील सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भावर यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने गुरूवारी रात्री उशिरा काढले.
दरम्यान, अधीक्षक घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची जिल्हा विशेष शाखेत तर, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना दहशत विरोधी पथकाचे प्रभारी करण्यात आले असून तेथील निरीक्षक अरविंद जोंधळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली असून नियंत्रण कक्षातील प्रवीण साळुंखे यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांसह विविध विभागात कार्यरत असणार्या 98 पोलीस अंमलदारांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, 16 अंमलदारांची सुधारित आदेशानुसार पहिली नियुक्ती रद्द करून दुसरी नियुक्ती देण्यात आली आहे.