Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भ व मराठवाड्यात वातावरणात बदल झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत तापमान प्रचंड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांत पुढील चार दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात मात्र हवामान कोरडं राहणार आहे. तापमानात वाढ झाल्याने विशेषतः दुपारी उन्हाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घ आजार असलेल्या नागरिकांसाठी हा काळ अत्यंत काळजीचा ठरू शकतो. पाणी भरपूर प्या, थेट सूर्यप्रकाश टाळा आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत.
दुसरीकडे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. 30 एप्रिल आणि 1 मे रोजीही ही स्थिती कायम राहणार आहे. राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत आहे. याशिवाय, विदर्भ ते उत्तर केरळ दरम्यान सक्रिय झालेल्या ट्रफमुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे, ज्यामुळे वादळ व पावसाच्या शक्यता वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित ठेवावे, तसेच नागरिकांनी विजांच्या गडगडाटात सुरक्षित स्थळी थांबावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.