अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) गुरुवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
भगवान महावीर जयंतीदिनी सकाळी 07.30 वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन रथ व शेवटी अनुकंपा गाडीही होती. आनंद संस्कार शिक्षा अभियान मंडळाच्या मुलामुलींनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच त्यांनी हातात जैन ध्वज व भगवान महावीरांचे संदेश असलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कापडबाजार जैन मंदिर येथून निघालेली शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रबुद्ध विचारक पू. आदर्शऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी पू. आलोकऋषीजी महाराज, पू. सत्यप्रभाजी म. सा., पू. त्रिशलाकंवरजी म. सा., पू. विश्वदर्शनाजी., पू. विपुलदर्शनाजी आदी साध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगान झाले.
यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सचिव संतोष बोथरा, आनंदराम मुनोत, डॉ. प्रकाश कांकरिया, वसंत लोढा, संजय चोपडा, अशोक (बाबूशेठ) बोरा, संतोष गांधी, महावीर बडजाते, सरोज कटारिया, डॉ.सुधा कांकरिया, आदी उपस्थित होते. खा.निलेश लंके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे असते. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आदर्शऋषीजी महाराज म्हणाले की, आज हजारो वर्षानंतरही भगवान महावीर स्वामींचे विचार मानव जातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते. आपण भगवान महावीरांचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. आजच्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. अशावेळी भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे. भगवान महावीर यांच्यामुळे आपण आहोत हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मनोमन त्यांचे तत्वज्ञान जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करावा.
कार्यक्रमाच्या शेवटी पेमराज, संतोष व सतीश बोथरा (पारस ग्रुप) परिवाराच्या वतीने गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली. जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी भगवान महावीर जीवन मनोगत करून विविध स्पर्धांचा निकाल जाहीर केला. रांगोळी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे आहे प्रथम – गुगळे परिवार (चितळे रोड), द्वितीय विभागून – मीनल पारख, राखी गांधी, सपना गुगळे, पूनम चोरडिया व प्रेक्षा जितेंद्र नहार, दर्शना जितेंद्र नहार, नवीपेठ, तृतीय विभागून- तनिषा देसरडा व मित चंगेडे, राणी चंगेडे, ख्रिस्त गल्ली. उत्तेजनार्थ – प्रिया गांधी (ख्रिस्तगल्ली), दर्शना अभिलाषा बोथरा (आडतेबाजार), दीपाली नितीन मुनोत (नवीपेठ), दिगंबर जैन महिला मंडळ.चौक सजावट प्रथम – गुगळे परिवार चितळे रोड, द्वितीय – जय आनंद महावीर युवक मंडळ, नवीपेठ, तृतीय – जय आनंद फाउंडेशन, दाळमंडई, उत्तेजनार्थ – बोथरा परिवार (आडतेबाजार), जैन दिगंबर मंदिर. स्पर्धेचे परीक्षण शैला गांधी, संगीता गांधी, सरोज कटारिया यांनी केले.