महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा; आदर्श कामगारांचा सत्कार सोहळा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगरच्या एमआयडीसीच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, या ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी उद्योगपतींची चर्चा सुरू आहे. शिड येथे संरक्षण खात्यासाठी लागणारे साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करणार आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून, टपऱ्यांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच औद्योगिक वसाहत अतिक्रमणमुक्त करणार आहे. तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सुपा एमआयडीसी साफ केले आहे, आता नगर एमआयडीसी ही साफ केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त नगर जिल्हा मजदूर सेना व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कामगार मेळावा आणि आदर्श कामगारांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबुशेठ टायरवाले, योगेश गलांडे, विनायक देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख अनिल शिंदे, दत्ता तापकिरे, अशोक दहीफळे, सुनील कदम, सुरेश क्षीरसागर, पोपट पाथरे, आनंद शेळके, महेश लोंढे, वसंत सिंग, माजी नगरसेवक सचिन शिंदे, कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले आदींसह कामगारउपस्थित होते.
केंद्र सरकारने कौशल्य विकास योजना सुरू केली असून आपल्या राज्यांनी देखील विद्यापीठाची स्थापना केली आहे. यातून नवी पिढी निर्माण होईल आपल्या कामगारांनी काळानुरूप बदल स्वीकारला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कामगारांनी अपडेट झाले पाहिजे. शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे. बाबुशेठ टायरवाले यांनी गेली 35 वर्षे नि:स्वार्थपणे कामगारांची सेवा केली आहे, आता त्यांनी असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला असून, तो कौतुकास्पद आहे. बाबू शेठ टायरवाले यांनी दत्ता सामंत यांच्या कामगार संगटनेचे आक्रमण आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ दिले नाही. कामगारांच्या अनेक व्यथा आहेत. त्या सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचे काम केले जाईल असेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, कामगार हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. आणि कामगार आणि शेतकरी यांच्यावरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यांच्याकडेच सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सरकारने केले पाहिजे. उद्योजक व कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन मध्यस्थीची भूमिका यशस्वीपणे पार पाडली जात आहे. आम्ही कधी कंपनी बंद पडेल असे पाऊल उचलले नाही, कंपनी जिवंत राहिली तर कामगार टिकेल.योगेश गलांडे म्हणाले की, असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडण्याचे काम आम्ही करत आहोत. कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून कामगार हितासाठी लढा उभारला जाईल. कामगार काम करीत असताना एखादी अचानक दुर्घटना घडली तरी त्याच्या आरोग्यावर तातडीने उपचार व्हावे यासाठी नगरमध्ये सुसज्ज असे कामगार हॉस्पिटल उभे राहणे गरजेचे आहे,
मी खासदार झालो असतो: टायरवाले
मी सुद्धा अहिल्यानगर दक्षिणचा खासदार झालो असतो मात्र शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी तिकीट विकून दमानियाला दिले. आता दोन्ही भाऊ एकत्र आले तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही फरक पडणार नाही. महायुतीमध्ये अजित पवार आले नसते तरी आपले सरकार आले असते. 40 वर्षांपासून कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत असल्याचे मत बाबुशेठ टायरवाले यांनी व्यक्त केले.