जालना / नगर सह्याद्री –
मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांचा मोर्चा थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाला २९ ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होणार असून दोन वर्षांपासून चाललेल्या या लढ्याचा शेवट होण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी आंदोलक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी “मुंबईकर आम्हाला लेकरं समजा. आम्ही गरीब आहोत, आमची लेकरं तुमच्या दारात न्यायासाठी येत आहेत. त्यामुळे आमच्यावर शंकेचं वातावरण तयार नका करू. सरकारला दंगल घडवायची आहे” असा सूर लावला.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे म्हणाले, ” उत्सवाचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. जसा गणेश उत्सव आमच्या लेकरा बाळांच्या सुखासाठी आहे तसेच आरक्षण सुद्धा मराठ्यांच्या लेकरांच्या सुखासाठी आहे. आम्ही मराठे हिंदुचे सगळे संस्कार आणि वारकरी संप्रदाय पाळतो. सरकारची लोक काही बातम्या पसरवतात त्यात आमची चूक काय? ” असे वक्तव्य त्यांनी केले.
पुढे ते म्हणाले “आम्ही न्यायासाठी येत आहे उलट तुम्ही आम्हाला पाणी दिले पाहिजे. या आंदोलनासाठी चार महिन्यांपूर्वी आम्ही तारीख काढलेली आहे तेव्हा गणेश उत्सव आहे असं आम्हाला माहित नव्हतं. मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं. कोणाचाही बाप आडवा येऊ द्या आम्ही शांततेत मुंबईत येणार आणि शांततेत आरक्षण घेणार आहोत. 100% सरकारला दंगल घडवायची आहे, त्यांना मराठ्यांच्या अंगावर जाळ फेकायच आहे.” असं मनोज जरांगे यांनी म्हटले
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पोलिस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांना विशेष यंत्रणा तयार ठेवण्याचं आदेश देण्यात आलं आहे. कारण, लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक, कायदासुव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी प्रचंड वाढलेली असते आणि या वातावरणात आंदोलन झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावोगावी जय्यत तयारी केली जात आहे. या आंदोलनाला मुंबईकरांचा प्रतिसाद कसा असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच सरकार या आंदोलनाबाबत कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.