पारनेर | नगर सह्याद्री
आमदार काशीनाथ दाते हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, माझ्यासारखेच खरोखर गरीब आमदार आहेत. पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः पाण्याच्या प्रश्नासह गोरगरीब जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार काशीनाथ दाते अथक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले.
पारनेर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेची समारोप प्रचार सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्या भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आमदार दाते यांच्या प्रयत्नांमुळे आणि अजित पवार यांच्या पाठबळाने पारनेर तालुका विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल. यावेळी त्यांनी दाते यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या साध्या राहणीमानाचा आणि जनतेशी असलेल्या जवळीकीचा विशेष उल्लेख केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, राष्ट्रवादी विद्याथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, पारनेर तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवक अध्यक्ष भास्कर उचाळे, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुधामती कवाद, महिला तालुकाअध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाअध्यक्षा अपर्णा खामकर, सोनाबाई चौधरी, आर. एस. कापसे, ऋषिकेश शेलार, प्रसाद सोनवणे, अशोक चोभे, सचिन डेरे, दिलीप दाते, ॲड. युवराज पाटील, विठ्ठल कवाद, प्रदीप दाते, युवा नेते किरण कोकाटे, मंगेश दाते, प्रसाद कर्नावट, सुभाष सासवडे, देवराम मगर, लहू रावडे, विकास रोकडे, अमोल रोकडे, शुभम टेकुडे, अक्षय गोरडे, सिद्धांत आंधळे, संदेश म्हस्के, दत्ता वाडेकर यांच्यासह पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही: काशिनाथ दाते
प्रचारसभेत बोलताना आमदार काशिनाथ दाते यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत आहे, परंतु पक्षात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. ही गटबाजी पक्षाच्या वाढीसाठी धोकादायक आहे.” त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. दाते यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आणि पक्ष वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
आदिवासींच्या प्रश्नांना प्राधान्य द्या: सुजित झावरे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी प्रचारसभेत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, “पारनेर तालुक्यात ठाकर, भिल्ल, पारधी यासारखा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.” त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांना आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची विनंती केली. झावरे यांनी झिरवळ यांना आदिवासींचे नेतृत्व म्हणून संबोधत, त्यांच्याकडून या दिशेने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.