आगरकर मळा परिसरात डेंग्युमुक्ती अभियान
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील डेंग्यू व पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागामार्फत मागील वर्षापासून डेंग्युमुक्ती अभियान सुरू करण्यात आले असल्याने नगरकरांमध्ये जनजागृती झाली आहे, शहरात दीड लाख लोक वस्ती असून महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. तरी नागरिकांनी आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आगरकर मळा परिसरामध्ये डेंग्युमुक्ती अभियान राबविले जात आहे. त्यानुसार शनिवारी स्टेशन रोड भागातील आगरकर मळा परिसरात अभियान घेण्ायत आले, त्यावेळी आयुक्त यशवंत डांगे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी महापौर शीलाताई शिंदे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, माजी नगरसेवक दीपक खैरे, विजय गव्हाळे, प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, सृष्टी बनसोडे, सुरेखा विधाते, बूथ हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी मेजर उषा गायकवाड, डॉ. सृष्टी बनसोडे, विकास गिते, आदी उपस्थित होते.
शहरामध्ये 20 आठवडे डेंग्युमुक्ती अभियान सुरू राहणार असून आतापर्यंत सहा आठवडे झाले आहेत. यामध्ये 350 घरांमधील पाणीसाठ्यामध्ये डेंग्युसदृश अळ्या सापडल्या आहेत. 550 पाणीसाठे नष्ट करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सात हजार घरांना भेट देत नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केले आहेत. नगरकरांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर जाऊन मोफत रक्त, लघवी तपासणी करून घ्यावी. डेंग्यू हा आजार रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला होऊ शकतो, हा आजार दिसतो तसा नसून जीव घेणारा आहे. तरी सर्व नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. अभय आगरकर म्हणाले की, शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी उपाययोजना करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी असून ती जबाबदारी आयुक्त यशवंत डांगे व त्यांचे सहकारी यशस्वीपणे पार पाडीत आहेत. नागरिकांनी देखील आपले सामाजिक दायित्व ओळखून यात सहभागी व्हावे.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे के. डी. खानदेशे म्हणाले की आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः फिल्डवर उतरून नागरिकांशी संवाद साधून डेंग्युमुक्ती अभियान राबवीत आहेत. त्यामुळेच आज शहरात डेंग्यू तसेच संसर्गजन्य आजार नियंत्रणात असल्याचे दिसून येते. माजी महापौर शीलाताई शिंदे म्हणाल्या की, डेंग्युसारख्या जीवघेण्या आजारापासून दूर राहण्यासाठी महापालिका प्रशासन आरोग्य विभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांची नागरिकांनी काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यावेळी महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्राच्या वतीने आशा सेविकांनी ‘डेंग्यूचा हल्ला व त्यावर मात’ या विषयावर पथनाट्य सादर केले. बूथ हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य असलेल्या फलकांद्वारे जनजागृती केली.
आजाराची लक्षणे जावताच औषधोपचार घ्यावा
महापालिका हद्दीमध्ये 20 आठवडे डेंग्युमुक्ती अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. डेंग्यूची अथवा तत्सम आजारपणाची लक्षणे जाणवताच नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्याच्या दृष्टीने संतुलित आहार घ्यावा असे आवाहन यावेळी आयक्त डांगे यांनी केले.