Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित मेळाव्यात एक महत्त्वाचं विधान करण्यात आलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. सात वर्षांपासून या पदाची धुरा सांभाळणाऱ्या पाटील यांनी आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली आहे. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी तुमच्या सर्वांसमोर शरद पवार यांना एवढीच विनंती करतो.
आपल्या मनोगतात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या यशाचा दाखला देत म्हटलं, एकेकाळी भाजपचे केवळ दोन खासदार होते. आज ते देशातील सर्वात मोठं पक्ष आहेत. त्यामुळे कोणीही घाबरू नका. आपण सर्वजण ताकदीने कामाला लागलो तर राज्यातील लढाई पुन्हा जिंकू शकतो. जयंत पाटील यांचं हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.
सात वर्षांपासून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नेटाने पार पाडली आहे. आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा त्यांचा सूर ऐकून शरद पवार काय निर्णय घेणार, याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मेळाव्यात पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार आणि आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील यांची विनंती केवळ एक औपचारिकता आहे की पक्षात नेतृत्वबदल होणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.