बीड | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 6 दिवसांसाठी उपोषण केलं होतं. उपोषण सोडल्यानंतर प्रकृतीच्या बाबतीत कुरबुरी सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. डिस्चार्ज दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय.
मराठा समाजातील काही तरूणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलीय. यावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच लवकरच आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, ’फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही. तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळमळ आहे, तशी तळमळ आमच्या लेकरांसाठी असू द्या’, असं जरांगे पाटील म्हणालेत. ’फडणवीस यांना बापाची माया आहे. वर्षावर जाणार पण मुलीची परीक्षा आहे, असे ते म्हणाले.
लेक काय असते तुम्हाला कळालं , आमच्या लेकरांच्या आत्महत्या झाल्या. हे तुम्हाला कळत नाही. आमच्या लेकरांची माया का येत नाही? आरक्षण का देत नाहीत?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.’आमचं ईडब्लूएस तुम्ही घालवलं आणि खापर आमच्यावर फोडता. मराठे तरूण आत्महत्या करत आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तुम्ही आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय का घेतला नाही? हा भेदभाव का?’ असा सवाल करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.
’एकाही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये’
’माझी मराठा समाजाला विनंती आहे. आता माझी तब्येत बरी आहे. मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्यानं आत्महत्या करू नये. सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. आंदोलनात असणाऱ्या आणि नसणाऱ्यांसाठी लढतोय’, असं जरांगे पाटील म्हणालेत. ’आम्ही उपोषण केलं, शांतपणे आंदोलन केलं. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार. राज्यातील प्रत्येक गावातील अडचणी आम्हाला समजायला हवीत. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा या ठिकाणी अडचणी येऊन सांगा’, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.