Maharashtra Weather: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे, आणि या बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचे आणि हिमवर्षावाचे संकेत मिळत असल्याने हवामान पूर्णतः विरोधाभासी होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात तापमानवाढ पुन्हा सुरू झाली असून, काही भागांत पारा चाळीशीपार गेला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत सोलापूर आणि अकोला येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ही आकडेवारी राज्यातील वाढत्या उष्णतेचं स्पष्ट संकेत आहे. दुसरीकडे राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे हवेतील आर्द्रता वाढेल. सध्या छत्तीसगडपासून सुरू झालेली हवामान प्रणाली मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटका आणि केरळ या भागांपर्यंत सक्रिय झाली आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे या क्षेत्रांत तापमानात अधिक वाढ होत आहे. राज्यात पुढील काही दिवसांत किमान आणि कमाल तापमानात मोठा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल आणि परिणामी बाष्पीभवनाची प्रक्रिया गती घेईल. त्यामुळे विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
तर काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते, ज्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रात उष्णतेचा कहर असतानाच, उत्तर भारतासाठी वेगळा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील उंच प्रदेशांवर नवीन पश्चिमी झंझावात धडकणार असून, त्यामुळे हिमवर्षावाची शक्यता आहे. मात्र, मैदानी भागांवर त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. संपूर्ण देशभरात एप्रिल महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता असून, उष्णतेची लाट तीव्र होईल. मात्र, महिनाअखेरीस उष्णतेची तीव्रता कमी होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.