कर्जत । नगर सहयाद्री:-
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर कार्यक्रमाच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनवर आमदार रोहित पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. यानंतर चर्चांना मोठे उधान प्राप्त झाले होते. यावर स्वतः आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याविषयी खुलासा करत आपली भूमिका जाहीर केली आहे.
ते उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय माझे काका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या नावाचे स्वागताचे फलक लावले यात गैर काहीही नाही. याचा अर्थ मी लगेचच भूमिका बदलली असा होत नाही, असा खुलास रोहित पवार यांनी करत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या बॅनरनंतर कर्जत नगरपंचायतीमधील (जिल्हा अहिल्यानगर) सत्ताबदलावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
माझी ईडी चौकशी झाली, माझ्या कंपन्यांच्या चौकशा केल्या गेल्या. पण, आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू, अशा शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतफलकाबाबत खुलासा केला. कंपनीची, माझी चौकशी झाल्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, शरद पवार यांच्याबरोबरच आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर झाली. यामुळे कर्जत जामखेडमध्ये सत्ताबदलाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
सरकारवर गंभीर आरोप
हे सरकार कसे काम करीत आहे, सत्तेशिवाय त्यांना कसे काहीच दिसत नाही याचे उदाहरण कर्जत पंचायतीवरून दिसून येते. दोन वर्षांपूव तिथे आमच्या विचाराच्या नगरसेवकांची सत्ता आली. भाजपचे दोनच नगरसेवक होते. तिथे अध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अशा ठरावाच्या कार्यवाहीची विशिष्ट पद्धत आहे. कोणासमोर याची सुनावणी व्हावी हे निश्चित आहे. मात्र, सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलली गेली, असल्याचे रोहित पवार म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठिंब्याने हे झाले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात लक्ष घातले होते.