Asia Cup 2025 : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना रंगला. सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने एकूण १४६ धावा केल्या. भारतीय संघाने १४७ धावांचे आव्हान पार करत आशिया कप २०२५ ची ट्रॉफी जिंकली. गतविजेता असलेल्या भारतीय संघाने पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेत जेतेपद टिकवून ठेवले आहे. या विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा ठरला आहे.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि पाकिस्तानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार साहिबजादा फरहान आणि फखर जमान हे दोघे मैदानात उतरले. दोघांनी पहिल्या काही ओव्हर्समध्ये सामना पाकिस्तानच्या बाजूने नेला. साहिबजादा फरहानने ५७ धावा आणि फखर जमानने ४६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ सैम अयुबने १४ धावा केल्या.
फरहान बाद झाल्यानंतर लागोपाठ पाकिस्तानचे खेळाडू बाद झाले. १९.१ ओव्हरमध्ये पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या बाजूला, कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबत अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ अशा प्रकारे ६ गडी बाद केले.
१४७ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय सलामीवीर जोडी मैदानात उतरली. अभिषेक शर्मा ५ धावांवर, सूर्यकुमार यादव १ धावेवर आणि शुबमन गिल १२ धावांवर बाद झाले. भारताला सलग ३ धक्के बसले असताना तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने संयमी पद्धतीने खेळ पुढे नेत भारताचे जेतेपदाचे स्वप्न टिकवून ठेवले. त्यातही तिलक वर्मा चमकला. महत्त्वाच्या सामन्यात त्याने अर्धशतकीय खेळी केली.
संजू सॅमसनने २१ चेंडूत २४ धावांची आवश्यक खेळी केली. तो बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात उतरला. शिवम आणि तिलक या जोडीने गरज ओळखून त्याप्रमाणे खेळ केला. तिलक वर्मा झुंज देत असताना त्याला शिवम दुबेची चांगली साथ मिळाली. गरज असताना त्याने फटकेबाजी करत भारतावरील दबाव कमी केला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा केल्या. तिलक वर्माने सामना जिंकवून देणारी खेळी केली. शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंहने विजयी शॉट मारला.