पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लवकरात लवकर या मोकाट बिबट्यांना जेरबंद करा अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, अन्सार पटेल, अरूण बेलकर, प्रविण खोडदे, रघुनाथ मांडगे, राजू रोकडे, राहुल गुंड आदींसह शेतकरी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबटे मानवांवर भ्याड हल्ले करत आहेत. नुकतेच खडकवाडी येथे चिमुकल्या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला करत तीचा बळी घेतला.
तसेच देसवडे येथेही भर सकाळी योगेश गोळे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. देसवडे परिसरासह इतर भागात बिबटे मोकाट फिरताना दिसत आहे. त्यामुळे शेतातील पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. बिबट्यांचा वावर पाहता हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अन्यथा शेकडो शेतकऱ्यासह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.