मुंबई । नगर सहयाद्री:-
मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौरऊर्जा आधारित पंप देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करून सोलर पंप बसवून घेतले असले तरी, अद्यापही हजारो शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने आता शेतकऱ्यांसाठी मोबाईल नंबर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. महावितरणच्या निरीक्षणात असे आढळले आहे की काही अर्जांमध्ये जुने, चुकीचे किंवा आधीच इतर अर्जांमध्ये वापरले गेलेले मोबाईल नंबर नोंदवले आहेत. त्यामुळे अर्जाची अचूक प्रक्रिया होण्यासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, Application with Duplicate mobile number found, please register your new mobile number for future processing application. म्हणजेच, जर अर्जावर दिलेला मोबाईल नंबर आधीच इतर कोणत्यातरी अर्जासाठी वापरण्यात आला असेल किंवा तो चुकीचा असेल तर शेतकऱ्यांना आपला नवा मोबाईल नंबर नोंदवावा लागणार आहे. पूर्वी मेडा कुसुम किंवा इतर सरकारी योजनांमध्ये वापरलेले मोबाईल नंबर या योजनेमध्येही वापरण्यात आले आहेत. त्यामुळे अर्जाच्या अचूकतेसाठी आणि योजनेच्या लाभासाठी नवीन व अद्ययावत मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम “मागेल त्याला सोलर पंप योजना”च्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php लॉगिन करावे. त्यानंतर आपला MKMID क्रमांक टाकून Change Mobile Number” हा पर्याय निवडावा. जुना नंबर भरल्यानंतर नवीन नंबर नोंदवून, त्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा आणि सबमिट करावे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईल नंबर यशस्वीरित्या अपडेट झाल्याचा संदेश महावितरणकडून मिळेल. शेतकऱ्यांनी तातडीने आपला मोबाईल नंबर अपडेट करून योजनेशी संबंधित सर्व अपडेट्स व सूचना मिळवाव्यात. जर मोबाईल नंबर अपडेट केला नाही, तर अर्जाची पुढील प्रक्रिया थांबू शकते आणि शेतकऱ्यांना सोलर पंप मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर त्वरित अद्ययावत करावा.