शिर्डी । नगर सहयाद्री:-
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या अहिल्यानगर येथील भाविकांची समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भाविकांना काही अडचण आल्यास या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याकरीता जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने जात आहेत. मध्यंतरी प्रयागराज येथे घडलेल्या घटनेनंतर जिल्ह्यातील काही भाविकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. याचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी भाविकांच्या मदतीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या मजल्यावर हा कक्ष स्थापन झाला असून, तालुका स्तरावर संबधित तहसिलदार यांची समन्वय आधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाकुंभ मेळ्यास गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांना काही अडचणी आल्यास संपर्क क्रमांकही देण्यात आले असून, यासाठी ०२४१-२३२३८४४ आणि २३५६९४० तसेच टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.