पुणे / नगर सह्याद्री :
वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलाने वैष्णवीचा खून केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणात अजित पवार यांचेही नाव घेतले गेले. वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. अजितदादांनी वैष्णवी आणि शशांक यांना फॉर्च्युनर कारची चावी दिली होती. या प्रकऱणात अजित पवार यांच्यावर टीका होत होती. अजित पवार यांनी याप्रकरणात आधी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हाकालपट्टी केली. त्यानंतर आपला या प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मी कुणाच्या लग्नात गेले, त्यात काय चुकी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
फॉर्च्युनर कार दिली का घेतली? असं मी त्यावेळीच विचारलं होतं. मी कुणाच्या लग्नात गेलो, त्यात माझी चुकी काय? हगवणे प्रकरण समजताच मी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून कारवाईचा आदेश दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आणखी तीन जण फरार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपी जिथे कुठे असतील, तिथून मुसक्या आवळून आणा असे सांगितलेय, असे अजित पवार म्हणाले.
अजितदादा संतापले –
वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर अजित पवार संतापले. माझ्या बदमानीचा कट आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. माझी काही चूक असेल तर फासावर लटकवा, असे अजित पवार म्हणाले. हगवणे यांच्यासारखी नालायक माणसं माझ्या पक्षात नको. गरिबांच्या दारात जाईन मात्र असल्या नालायक लोकांच्या दारात जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले ?
वैष्णवी हगवणे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारे आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची चौकशी हत्येच्या अनुषंगानंच होणार आहे. दोषींवर कारवाई करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राजेंद्र हगवण यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे खुलास होत असून माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र हगवणे यांच्यावर बडतर्फची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
तीन आरोपींना न्यायालयीन पोलिस कोठडी
दरम्यान, या प्रकरणात वैष्णवीचा सासरच्या लोकांनी छळ केला असल्याचा आरोप देखील होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून वैष्णवीचा सासरा आणि दीर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे चार पथक तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.