अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिक्षकांची कामे कोण करतात, हे लक्षात ठेवा. अन्यथा पाच वर्षांनी शिक्षक हे विसरून जातील. मी स्वत: डॉक्टर असल्याने गरज असल्यास गोळी देखील देतो. मात्र, आम्ही केलेले काम लक्षात ठेवा. अधिकार्यांनी जाताना चांगले काम करावे, म्हणजे लक्षात राहते, असा सल्ला देत शिक्षकांच्या हजेरीबाबतच्या क्यूआर कोडचा विषयावर लवकरच शालेय शिक्षणमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
रविवारी नगरमध्ये आयोजित शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे, डॉ. संजय कळमकर, राज्य शिक्षक संघाचे उपनेते रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, संजय शेळके, भास्कर नरसाळे, कैलास दहातोंडे, रावसाहेब शिंदे, कैलास चिंधे, सुरेश निवडुंगे, राजू साळवे यांच्यासह जिल्हा शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक सभासद उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, आम्ही जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठीशी असून शिक्षकांनी याची जाण ठेवावी.
जिल्हा परिषद प्रशासनाने लागू केलेल्या क्यूआर कोडला शिक्षकांचा विरोध असून या विषयातून सुवर्णमध्य काढण्यासाठी लवकरच शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षकांवर अविश्वास ठेवणे योग्य नसले तरी शिक्षकांनी देखील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या माध्यमातून 500 शाळा खोल्यांना मंजुरी देण्यात आली असून सर्व शाळा सौर योजने स्वयंपूर्ण करत त्या डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
शिक्षकांची वकिली करणार: आ. काशिनाथ दाते
पारनेरचे आ. काशिनाथ दाते यांनी शिक्षकांना सबुरीचा सल्ला देत ध्येयावर श्रध्दा ठेवावी. शिक्षकांच्या क्यूआर कोडच्या विषयात चर्चा करण्यासाठी शिक्षणमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचा निर्णय झाला असून या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार राहत शिक्षकांची वकिली करणार असल्याचे आश्वासन दिले. राज्यात सध्या खाजगी शिक्षण संस्थांचे फुटले असून यातून खाजगी आणि सरकारी शिक्षणाच्या दर्जात यात तुलना करण्यात येत आहे. क्यूआर कोडबाबत शिक्षकांच्या मागण्या रास्त असून कदाचित जिल्हा परिषदेत निवडणुका होऊन पदाधिकारी असते तर ही वेळ आली नसती. पदाधिकार्यांशिवाय जिल्हा परिषदेत अधिकार्यांवर अंकुश नसल्याचे आ. दाते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजमधील अन्यायकारक निर्णय थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत राज्यात नगर जिल्हा गुणवत्तेत अव्वल असून त्यात पारनेर तालुका नंबर वन असल्याचा विश्वास व्यक्त केला.