Crime News: प्रेमविवाह केला, पण लग्नाच्या दोन महिन्यांतच नवऱ्याची ‘सिने स्टाईल’ मेंटॅलिटी उफाळून आली. पत्नी माहेरी गेली म्हणून सिन्नर तालुक्यातील वैभव पवार याने पत्नी कल्याणी दळवी हिचं थेट अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना 19 मार्च रोजी सिन्नरच्या पांगरी गावात घडली. पत्नीवर राग आल्यामुळे वैभवने चारचाकी गाडी घेऊन मित्रांसह गावात धडक दिली आणि सासू समोरच पत्नीवर झडप घेत, तिला जबरदस्तीने गाडीत कोंबलं आणि अपहरण केलं. कल्याणी दळवी हिने 20 जानेवारी 2025 रोजी वैभव पवारसोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतर वैभवने तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे 8 मार्चला कल्याणी माहेरी परतली. याचा राग मनात ठेवून वैभवने अपहरणाचा कट रचला. 19 मार्च रोजी कल्याणी आपल्या आई आणि भावासोबत पांगरी इथे आली असताना, अचानक वैभव आपल्या मित्रांसह गाडीने आला.
त्याने तिला गाडीत अपहरणानंतर वैभवने कल्याणीला संगमनेरमार्गे लोणीपर्यंत नेले. तेथून दोघं शिर्डीच्या दिशेने पायी जात असताना पोलीसांना संशय आला आणि चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. कल्याणीने पोलिसांना आपल्या अपहरणाची आणि छळाची संपूर्ण माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून पती वैभव पवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे आणि सहायक निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.