गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली!
पारनेर | नगर सह्याद्री
गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेत काही खातेदारांनी सोनेतारण कर्ज केले. घेतलेले कर्ज तीन वर्षे त्यांच्याकडून परत झाले नाही आणि याच संधीचा गैरफायदा उठवत बाजीराव पानमंद व त्याच्या काही सहकाऱ्यांनी या सोन्याच्या सीलबंद पिशव्या- पाकीटे फोडली. त्यातील खरे असणारे जवळपास दीड कीलो सोने काढून घेतले आणि त्या पिशव्यांमध्ये डुप्लीकेट सोन्याचा मुलामा असणारे डाग ठेवले. पुढे काही महिन्यानंतर या पिशव्या पंचांसमक्ष उघडण्याचा ड्रामा करण्यात आला. त्यावेळी मुळ कर्जदार अथवा गोल्ड व्हॅल्युअर या दोघांनाही बोलावले नाही आणि स्वत:च पंच झाले. त्याचे शुटींग काढले आणि संपूर्ण सोनेच बनावट असल्याचा कांगावा केला गेला. तब्बल दीड किलो खरे असणारे सोने बनावट असल्याचे जाहीर करण्यात आले आणि कोट्यवधी किमतीचे दीड किलो सोने फस्त करुन त्याचे खापर पारनेरमधील शैलेंद्र डहाळे या सराफावर फोडले. मात्र, शैलेंंद्र डहाळे याने बाजीराव पानमंद याचा पर्दाफाश करत खरे सोने खोटे का आणि कोणी केले याचा जबाब पोलिसांसमोर दिल्याने बाजीरावची तोतयेगिरी उघड झाली असल्याचा दावा गोरेश्वर सहकार बचाव मंडळाचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी केला आहे.
पारनेर येथील शैलेंद्र डहाळे हे गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेचे गोल्ड व्हॅल्युअर होते. पतसंस्थेमध्ये अनेकांनी सोने तारण केले होते. आभुषण ज्वेलर्स ही त्यांची फर्म आहे. 2018 पासून 2021 पर्यंत ते व्हॅल्युअर म्हणून होते. सोन्याचे वजन आणि खात्री केल्यानंतर कस्टमर, मॅनेजर आणि व्हॅल्युअर यांच्या संयुक्त सहीने ते पाकीट सील केले जाते. पारनेरमध्ये संस्थेचे लॉकर नाही. त्यामुळे येथील शाखेत सोनेतारण म्हणून आलेले सोने पतसंस्थेचे कर्मचारी गोरेगावमध्ये मुख्य शाखेतील लॉकरमध्ये ठवायचे. कोरोना कालावधी होता. पुढे तीन वर्षभरात अनेकांना हे सोने सोडवता आले नाही. त्यामुळे हे सोने पतसंस्थेने जप्त केले. सोने पतसंस्थेच्या मालकीचे झाले. त्यावेळी चेअरमन आणि काही संचालकांनी संगनमत केेले आणि ते सोने बाहेर काढले. हे करताना गोल्ड व्हॅल्युअरची सही घेतली नाही. खरे सोने बाहेर काढल्यानंतर त्या पिशवीत- पाकीटात त्याच डिझाईनचे दुसरे सोने टाकण्यात आले आणि पुन्हा ते सोने सिलबंद करुन लॉकरमध्ये टाकले गेले. यातून सुमारे दीडकोलो सोने मोडले. यानंतर सोने जप्त करण्याची खोटी कारवाई दाखवली गेली. त्यावेळी त्याचे शुटींगही केले. मात्र, हे करताना आपल्याला बोलावणे बंधनकारक असतानाही तसे केले नाही. परस्पर अन्य दुसरेच पंच घेतले आणि 2022 मध्ये हे सोने खोटे असल्याचा ड्रामा केला गेला. त्यात स्वत: बाजीराव पानमंद पंच म्हणून राहिल्याचेही समोर आले आहे. पुढे प्रशासक आल्यानंतर म्हणजेच 2024 मध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला. म्हणजेच दोन वर्षे हे प्रकरण असेच दाबून का ठेवले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अलीशान बंगल्याच्या गेटबाहेरुन ठेवीदारांना हुसकावून लावणाऱ्या याच त्या प्रिती पानमंद!
ठेवीदारांसह बचत खात्यावर अडकलेले मोलमजुरी करत बचत करुन ठेवलेले पैसे मागण्यासाठी अनेक ठेवीदारांनी संस्थेचे मुख्यालय आणि जोडीने बाजीराव पानमंद यांचा अलिशान बंगला गाठला. गेटवर आलेल्या आयाबायांसह ठेवीदारांना आणि खातेदारांना हुसकावून लावण्यासाठी आता भावनिक साद घालणाऱ्या प्रिती संकेत पानमंद याच पुढे येत होत्या आणि अक्षरक्ष: शिव्यांची लाखोली वाहत होत्या. आज संस्था ताब्यात द्या, अशी भावनिक साद घालणाऱ्या या त्याच प्रिति पानमंद आहेत हे सभासद विसरलेले नाही. त्यावेळी हुसकावून लावताना ‘आमचा त्या संस्थेशी काहीही संबंध नाही, तुमचे पैसे तिकडे कोणाकडेही मागा’, असे दरडावून सांगत हुसकावणाऱ्या प्रिती पानमंद यांना आता त्याच सभासद, ठेवीदारांसमोर हात पसरण्याची वेळ आली.
बिचाऱ्या विस्तार अधिकाऱ्याची पेन्शन कोणामुळे रोखली गेली, हेही सांगा!
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत असताना बाजीराव पानमंद याने त्या शाळेवर त्याच्या जागेवर परस्पर डमी शिक्षक नेमला. हा डमी उमेदवार गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी. त्याला पगार पतसंस्थेचा आणि तो काम करायचा मुलांना शिकविण्याचे! दुसरीकडे ज्याला जिल्हा परिषदेचा पगार मिळायचा तो बाजीराव पानमंद सात- आठ वर्षे पतसंस्थेच्या कामानिमित्ताने राज्याभर फिरायचा! बाजीराव शाळेत नसतानाही तो शाळेत असल्याचे, त्याच्या शालेय तपासणीचा अहवाल सादर करण्याचे काम राजकीय दबाव टाकून बाजीराव पानमंद याने विस्तार अधिकाऱ्याकडून करुन घेतले. बाजीरावची तोतया शिक्षकगिरी उघडकीस येताच त्या विस्तार अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली. हा विस्तार अधिकारी सेवेतून निवृत्त झाला असला तरी त्याची पेन्शन रोखली गेली आहे. त्याला जबाबदार असणाऱ्या बाजीरावने या अधिकाऱ्याला, त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले आहे.
सत्त्याला खोट्या सहानुभूतीच्या सजावटीची कितीही झालर त्यांनी लावली तरी…!
सभासदांसह ठेवीदार आणि खातेदार यांचा प्रचंड तळतळाट बाजीराव आणि त्याच्या कुुटुंबाने घेतला आहे. त्यातूनच सभासद यांना दारात उभे करेनासे झाले आहेत. सभासदांमधून तीव्र विरोध होत असल्यानेच आता त्याची सुन, पत्नी आणि मुलगा गावागावात जाऊन रडण्याचे नाटक करत आहेत. या संपूर्ण परिवाराने अत्यंत नियोजनबद्ध कट रचला आणि ही संस्थाच गिळंकृत केली. त्याची पहिली पायरी त्यांनी मल्टीस्टेट पतसंस्था विक्री करुन गाठली. आता त्यांना गोरेश्वर ग्रामीण हवी आहे. ती फक्त आणि फक्त त्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून! ठेवीदार वाऱ्यावर असताना हेच कुटुंब ठेवीदारांना दारातून हुसकावून लावत होते. त्यामुळे सत्याला खोट्या सहानुभूतीच्या सजावटीची कितीही झालर त्यांनी लावली तरी त्यांचा खरा चेहरा यापूवच समोर आला असल्याने सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.
कर्मचाऱ्यांच्या पगारातूून महिन्याला कपात केले जाणारे एक हजार रुपये कोणी घेतले?
गोरेश्वर ग्रामीण आणि मल्टीस्टेट या दोन्ही पतसंस्थांमधून जवळपास दीडशे कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा एक हजार रुपये कपात केली जात होती. कपातीची ही रक्कम संस्थेच्या कोणत्याच खात्यात जमा होत नव्हती. ही रक्कम थेट चेअरमनकडे जमा केली जात होती आणि त्यासाठी त्याने त्याच्या विश्वासातील जवळचा कर्मचारी नियुक्त केला होता. महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून दीड लाख घेणाऱ्यांना ही संस्था पुन्हा त्याचसाठी ताब्यात हवी असल्याचा आरोपही तांबे यांनी केला.
कर्मचाऱ्यांचा वर्षातील एक महिन्या पगार कोण घेत होते?
गोरेश्वर मल्टीस्टेट आणि गोरेश्वर ग्रामीण या दोन्ही पतसंस्थांमध्ये बाजीराव पानमंद हेच चेअरमन होते. या दोन्ही संस्थांमध्ये जवळपास 150 कर्मचारी काम करत होते आणि आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचा वर्षातील एका महिन्याचा पूर्ण पगार बाजीराव पानमंद हे स्वत: घेत होते. साधारणपणे एका कर्मचाऱ्याला महिन्याला वीस हजार पगार असल्याचे गृहीत धरले तरी या माध्यमातून बाजीराव पानमंद हे 30 लाख रुपये मिळवत होते. याशिवाय पतसंस्थेत नोकरीला घेताना दोन- दोन लाख घेतल्याचे पुरावेही समोर आले आहेत. आता पुन्हा संस्था याचसाठी त्यांना ताब्यात हवी आहे काय?
वाहन खासगी होते तर मग त्याच्या चालकाचा पगार संस्थेतून कसा?
बाजीराव हे संस्थेचे चेअरमन असताना ते त्यांच्या खासगी मालकीची इनोव्हा गाडी वापरत होते. त्याच्यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, त्या गाडीवर जो चालक गेली अनेक वर्षे राहिला त्या चालकाचा पगार गोरेश्वर पतसंस्थेतून दिला गेला. आजही तो चालक संस्थेचा कर्मचारी म्हणून रेकॉर्डवर आहे. गाडी खासगी होती असे ते सांगत असतील तर मग संस्थेचा कर्मचारी चालक म्हणून कसा घेतला आणि त्याचा पगार संस्थेतून कोणत्या ठरावानुसार दिला? त्या ठरावाला अनुमोदन आणि सुचक म्हणून कोण होते हेही समोर येण्याची गरज आहे.
साडेदहा कोटी कुटुंबातच कर्ज वाटप कसे झाले?
गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था शेवटच्या टप्प्यात अडचणीत आली असताना प्रशासक येण्याच्या काही दिवस आधी बाजीराव पानमंद याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह पोपट ढवळे व ढवळे याच्या कुटुंबातील तीघे आणि आझाद ठुबे, त्यांचे चिरजीव स्वराज यांच्या नावाने कोणतेही तारण न घेता तब्बल साडेदहा कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कर्जवाटपातील कमीशनवर कोणी मिळवला मलिदा!
गोरेश्वरच्या ऑडीट रिपोर्टमध्ये कुणाला कसे चुकीचे कर्जवाटप झाले हे स्पष्टपणे समोर आले आहे. यातील अनेकांना कर्ज देताना त्या कर्जदारांनी कमिशन दिले आहे. त्यांनी तसे जबाब नोंदवले आहेत. या संपूर्ण कमिशनची रक्कम मोठी आहे. कर्जदारांकडून कमिशन घेणारे आज नाशिकमध्ये जेलची हवा खात आहेत. ठेवीदारांच्या पैशांची उधळपट्टी करताना व त्यावर कमिशन खाताना ज्यांना काहीच वाटले नाही ते आज पुन्हा मतदारांसमोर निर्लज्जपणे मतांचा जोगावा मागत असल्याचे टोलाही तांबे यांनी लगावला.