मुंबई | नगर सह्याद्री:-
फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी सोलापूर येथे उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद झाली. सोमवारी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात थंडी ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे.
रविवारी (ता. 9) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान 35 अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.येत्या दोन दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान मात्र पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान रविवारी 34 ते 35 अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले. कोरेगाव पार्क, मगरपट्टा येथे ते जास्त होते, तसेच किमान तापमानही पुण्यातील 25 वेगवेगळ्या भागांमध्ये 22.7 ते 14.4 च्या दरम्यान नोंदवले गेले. यापैकी 22.7 हे दापोडी, तर वडगावशेरी, चिंचवड, लवळे येथे 20 च्या दरम्यान होते. राजगुरुनगर, आंबेगाव, निमगिरी येथे 17 अंशाच्या दरम्यान ते होते. येत्या आठवडाभरात आकाश निरभ्र राहणार असून, सकाळी विरळ धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला.महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्याचा अंदाज आहे.