मुंबई | प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्यात चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ सप्टेंबरपासून महाराष्ट्रासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा प्रभाव सध्या पश्चिम भारतावर अधिक जाणवत असून, समुद्रसपाटीच्या जवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थानच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, तसेच २ सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. यामुळे पुढील सात दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
राज्यात हायअलर्ट!
२ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
२ सप्टेंबर :
सातारा, सांगली, कोल्हापूर (घाटमाथ्यावर): ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे (घाटमाथा): यलो अलर्ट
मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर: यलो अलर्ट
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट
३ सप्टेंबर :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा): ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर व संपूर्ण विदर्भ: यलो अलर्ट
४ सप्टेंबर :
रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा): ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार व विदर्भ: यलो अलर्ट
शेतकरी व नागरिकांनी घ्यावी काळजी
पावसाचा जोर पाहता शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाचे उपाय करावेत, तसेच नद्या-नाल्यांच्या जवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घाटमाथ्यावरील भागांत भूस्खलनाची शक्यता असल्याने प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.