जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवार व मंगळवारी तालुक्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे गावोगावच्या ओडे नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तालुक्यात २८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे गावाला तळ्याचे स्वरूप आले आहे.
जामखेड तालुक्यात मे महिन्याची सरासरी ३५.३ मिलिमीटर आहे. मे महिन्यात आतापर्यंत सरासरी तब्बल २८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सलग पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सकाळ उजाडताच आभाळ दाटून येते, दुपारपर्यंत हलका किंवा मध्यम पाऊस, आणि रात्रीच्या वेळी अचानक मुसळधार पावसाची बरसात होते. यामुळे बळीराजा अक्षरशः वैतागला आहे.
जामखेड तालुक्यातील ३० हून अधिक गावांना अवकाळी पावसाचा जबरदस्त दणका बसला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सरींनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कांदा, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर यांसारख्या भाजीपाला पिकांसह डाळिंब, लिंबू, आंबा अशा फळपिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका खर्डा, जवळा, कुसडगांव, नान्नज, बावी, हळगाव, शिऊर पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी, राजुरी, लोणी, साकत, बांधखडक या गावांना बसला आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बाधित भागांना भेटी देत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी अहवाल शासनाला सादर केला जाईल. कोणीही घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्यासोबत आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही अशी प्रतिक्रिया तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे.
चार जनावरांचा मृत्यू
अवकाळी पावसात विजेचा जोर वाढल्याने चार शेतकऱ्यांच्या गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. लोणी येथील परमेश्वर शेंडकर, जवळा येथील महादेव वाळुंजकर, मोहरी येथील राहुल भिसे आणि दिघोळ येथील सुदाम गिते यांच्या गायी मृत झाल्याची घटना घडली आहे. जनावरे ही शेतकऱ्यांची उपजीविकेची महत्त्वाची साधने असल्याने यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे. बाधित भागांना भेटी देणे सुरू केले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.
जामखेड तालुक्यातील पाऊस (मिलिमीटर)
जामखेड- (२८०. ५), अरणगाव-(२ ६८.२),खर्डा-(३०६.७), नान्नज (२४६.२),नायगाव- (२४१.४), पाटोदा-(१०१.२), साकत- (१६८.२)