सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, बाबुड, कडूस, पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतान, मुंगशी, हंगा, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या गावात गेले आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवार दि.22 रोजी रात्री 11 ते मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान ढगफूटी सदृश पाऊस झाला. बेसुमार झालेल्या पावसाने पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुड येथील बस क्रमांक 1 वरील पुलावरून जोराचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे 10 तास रस्ता बंद होता. यामुळे ग्रामस्थ, विद्याथ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहायाने पुलाच्या मोरया मोकळ्या केल्यानंतर व पाणी कमी झाल्यानंतर रस्ता सुरु करण्यात आला.
तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस बरसल्याने आनंद व्यक्त करावा की शेतीच्या नुकसानामुळं चिंता व्यक्त करावी, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची दैणा उडाली आहे. या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सुपा परिसरातील गावात मागील 7 ते 8 दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुलाची उंची वाढवा!
गेली आठ दिवसांपासून सुपा परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसातून बाबुड येथील बस क्रमांक 1 येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद होता. सोमवार दि. 22 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने देखील हा रस्ता 10 तास बंद होता. यादरम्यान ये- जा करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या पुलाची उंची जमिनीलगत असल्यामुळे साधारण पावसात देखील हा रस्ता तासंतास बंद रहातो. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.