मुंबई / नगर सह्याद्री :
दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये वाढलेली पावसाची तीव्रता पाहता हाच का तो परतीचा पाऊस, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या अधिक पाऊस झाला असून, पावसाचा जोर वाढून पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
26 सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल असाही सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर हे अस्मानी संकट पाहता काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम शेतीसह जनजीवनावरही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुन्हापुन्हा का वाढतोय पावसाचा जोर?
ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, या कारणास्तव उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पुढं गेला याहे. याचदरम्यान पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापाशी गुरुवारपर्यंत आणखी एका कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्रातील हवामानावर याचा परिणाम होणार असून, वारे फिरल्यानं राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीसुद्धा केंद्रीय जल आयोगाचा हवाला देत राज्यातील काही नद्या आधीच पूर परिस्थितीतून वाहत आहेत असताना 26 Sep पासून राज्यात मुसळधार- अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे, येत्या आठवड्यात सतर्क राहण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय वीज पडण्याच्या आणि बहु- धोक्याच्या IMDच्या सूचना असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.
राज्यात एकाच वेळी अतिवृष्टी अन् तापमानवाढ…
राज्यात एकिकडे अतिमुसळधार पावसाचा इशारा असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत पाऊस काहीशी उसंत घेताना दिसेल. पण, अधूनमधून ढगाळ वातावरणही नाकारता येत नाही. तिथं सध्याच्या घडीला नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इथं बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद असून हा आकडा 34.2 अंशांच्या घरात होता. त्यामागोमाग अमरावतीत 33.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आली.