spot_img
अहमदनगरजीएस महानगर बँक निवडणुकीत गीतांजलीताईच किंगमेकर ; बँकेत एकहाती वर्चस्व, काय म्हणाल्या...

जीएस महानगर बँक निवडणुकीत गीतांजलीताईच किंगमेकर ; बँकेत एकहाती वर्चस्व, काय म्हणाल्या पहा..

spot_img

सर्व 18 जागांवर दणदणीत विजय | झालेल्या मतदानात 80 टक्के मते गीतांजली शेळके समर्थकांना
मुंबई | नगर सह्याद्री
राज्यातील अगग्रण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जीएस महानगर बँकेची सत्ता एकहाती खेचून आणण्यात गीतांजली उदयराव शेळके यांना यश आले. त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार एकूण मतदानाच्या 80 टक्के मिळवून विजयी झाले. विरोधी सुमनताई शेळके यांच्या मंडळाचा सभासदांना धुव्वा उडवला आणि गीतांजली शेळके यांच्या मंडळावर मतांचा वर्षाव करत त्यांच्या ताब्यात बँक दिली. 18 जागांवर दणदणीत विजय मिळवताना गीतांजली शेळके यांच्या मंडळाची एक जागा आधीच बिनविरोध निवडून आली होती. गीतांजली शेळके यांच्यावर सभासदांनी मोठा विश्वास व्यक्त केल्याचेच यातून स्पष्ट झाले असून या एकतर्फी विजयाच्या त्याच शिल्पकार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानासाठी 69 हजार 421 मतदार पात्र होते. त्यापैकी रविवारी झालेल्या मतदानात 17 हजार 681 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार झालेले मतदान हे अवघे 25.47 झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वात आधी सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी सुरु करण्यात आली. सर्व साधारण मतदारसंघात गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व उमेदवार हे अंशी टक्के मते मिळवून आघाडीवर राहिले. म्हणजेच सुमनताई शेळके यांच्या मंडळाला वीस टक्केच्या आसपास मतदान झाले. यानंतर महिला आणि अन्य मतदारसंघाची मतमोजणी झाली. येथे देखील हे प्रमाण 80 टक्के असेच राहिले. एकूणच ही निवडणूक गीतांजली शेळके यांनी एकहाती जिंकल्याचेच स्पष्ट झाले.

शेळके मायलेकींनी ओढून घेतली पराभवाची नामुष्की!
सुमनताई आणि स्मीता या मायलेकींना सभासदांनी स्पष्टपणे नाकारल्याचे आज स्पष्ट झाले. स्नुषा असणाऱ्या गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर सभासदांनी मोठा विश्वास टाकला. मतदार क्रॉस वोटींग करतील आणि किमान आपल्याला मतदान करतील अशी भाबडी अपेक्षा त्यांची होती. मात्र, मतदारांनी तसे केले नाही. सुमनताई यांच्याबद्दल मतदार, सभासद अशा साऱ्यांनाच आदर होता. मतदानाला जाताना आणि मतदान करुन बाहेर पडतानाही सभासद हा आदर व्यक्त करत होते. मात्र, गेल्या दोन वर्षात मुलगी स्मीता पटेल हिच्या इशाऱ्यावर बँकेत सर्वच घटकांना जो त्रास झाला, त्याबद्दलचा त्रागा मतदारांनी मतदानातून व्यक्त केला. निकाल असाच लागणार हे स्पष्ट असतानाही मुलीच्या हट्टी भूमिकेसमोर डोळ्यावर पट्टी बांधलेल्या सुमनताई यांच्यासह त्यांच्या मुलीवर देखील पराभवाची नामुष्की ओढवली.

गीतांजली शेळके यांना दोन्ही ठिकाणी सर्वाधिक मते
विजयी पॅनलच्या प्रमुख असणाऱ्या गीतांजली शेळके यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवली होती. सर्वसाधारण मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मते मिळाली असताना दुसरीकडे त्यांनी महिला राखीव मतदारसंघात सासूबाई असणाऱ्या सुमनताई आणि ननंद असणाऱ्या स्मीता यांच्या विरोधातही उमेदवारी ठेवली होती. या मतदारसंघात देखील गीतांजली शेळके यांना सर्वाधिक मते मिळाली. दोन्ही मतदारसंघातून त्यांनी विजयी मिळवला. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत असे पहिल्यांदाच घडले असून हा विक्रम आता
गीतांजली यांच्या नावावर नोंदवला गेला.

गीतांजली शेळके याच असणार चेअरमन!              
व्हाईस पदी कोण?
बँक निवडणुकीत सर्व संचालकांना निवडून आणण्यात गीतांजली शेळके यांचीच भूमिका निर्णायक राहिली. या विजयाचे श्रेय कोणत्याच संचालकाला अथवा पाठीराख्यांना नक्कीच नाही. गीतांजली शेळके यांच्यावर असणारा विश्वास आणि उदयदादांच्या निधनानंतर त्यांच्यावर झालेला अन्याय, स्मीता शेळके- पटेल यांच्याकडून झालेला सभासद, अधिकारी- कर्मचारी आणि खातेदार यांना त्रास याची परिणीती म्हणजेच गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सभासदांनी दिलेला कौल यात झाले. बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली शेळके यांची निवड निश्चित मानली जात असताना उपाध्यक्षपदासाठी त्यांची पसंती कोणाला असेल यावरच सारे काही अवलंबून असणार आहे.

हा विजय मोठ्या साहेबांसह उदयदादांना समर्पित- गीतांजली शेळके
सभासदांचा मोठा विश्वास आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखीत झाला आहे. मोठ्या साहेबांनी म्हणजेच सॉलिसीटर गुलाबराव शेळके साहेब आणि उदयदादा यांनी बँक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. त्यांनी घालून दिलेल्या सहकाराच्या आदर्श वाटेवरच मी आणि माझे सहकारी संचालक ही बँक जपतली आणि वाढवतील. सभासदांनी दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असून हा विजय मोठ्या साहेबांसह उदयदादांना मी समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया मंडळाच्या प्रमुख गीतांजली शेळके यांनी ‌‘नगर सह्याद्री‌’शी बोलताना दिली.

स्मीतामुळेच सुमनताई पडल्या एकट्या!
गेल्या दोन- अडीच वर्षात बँकींगमधील काहीही समजत नसलेल्या स्मीता शेळके- पटेल यांनी उदयराव शेळके यांच्या निधनानंतर बँकेचा अक्षरक्ष: ताबा घेतला होता. चेअरमन म्हणून सुमनताई कामकाज पाहत असल्या तरी त्यांच्या शेजारी खासगी प्रॉपट समजून स्मीता शेळके – पटेल या दुसरा टेबल- खुच मांडून बसल्या. त्यांना सुमनताई यांनी रोखण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता त्यांनी स्मीताला मुकसंमती दिली. स्मीताच्याच अट्टाहासामुळे ही निवडणूक झाली हे आता झालेल्या मतदानातून स्पष्टपणे समोर आले आहे.

नगर सह्याद्रीचा अंदाज खरा ठरला!
बँकेची निवडणूक जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गीतांजली शेळके यांनी त्यांचे संघटनकौशल्य पणाला लावले होते. त्याची चुणूक वेळोवेळी त्यांनी दाखवून दिली. मतदान चार दिवसांवर आलेले असताना गीतांजली शेळके यांच्याच बाजूने निकाल लागणार असल्याचा स्पष्ट अंदाज ‌‘नगर सह्याद्री‌’ने व्यक्त केला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.

विजयी उमेदवार
* सर्वसाधारण मतदारसंघ- गीतांजली उदयराव शेळके, आडसूळ सचिन सीताराम, ढोले रविंद्र दत्तात्रय, गुंजाळ गणेश सावकार, कवाद भास्कर बाबाजी, खणकर सतीश अनंत, खोसे कुंदा भास्कर, खोसे मंगेश नारायण, कोठावळे श्रीधर कोंडीराम, लंके बबन भाऊ, पठारे संतोष किसन, शिंदे शंकर पांडुरंग, शिंदे पांडुरंग विष्णू, थोरात मंगलदास भाऊसाहेब. * महिला राखीव- गीतांजली उदयराव शेळके, वाढवणे छाया रामदास. * इतर मागास- थोरात भिवाजी भागुजी. * भटक्या विमुक्त जाती- जमाती- पालवे विलास दगडू. * अनुसुचित जाती- जमाती- संतोष भाऊराव रणदिवे (बिनविरोध).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार मुंबई | नगर सह्याद्री देशातील शेती आणि...