एकहाती प्रचारयंत्रणा | सभांच्या जोडीने प्रत्यक्ष गाठीभेठीवर भर | कर्मचाऱ्यांमधूनही समर्थनाची निर्माण झाली लाट
पारनेर | नगर सह्याद्री:
पदराआडून चालणारा चेअरमनच्या केबीनमधील दुसऱ्या टेबलवरील कारभार आणि सभासद- कर्मचारी आणि खातेदार अशा साऱ्यांनाच मिळालेली अडीच वर्षातील अपमानास्पद आणि तुसडेपणाची वागणूक हे मुद्दे अत्यंत ठळकपणे आणि जोरकसपणे मांडत श्रीमती गीतांजली उदयराव शेळके यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आक्रमक भूमिका घेतली. पहिल्यापासूनच गितांजली शेळके यांच्याबाबत सहानुभूतीची लाट निर्माण झाली होतीच आणि ही लाट प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गितांजली शेळके यांच्या बाजूने अधिकच सरकल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पारनेकरांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सध्या होत आहे. संचालक मंडळ निवडण्यासाठी दि. 1 जून रोजी मतदानाची प्रक्रिया होत आहे. तीन हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणारी ही बँक पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्याच्या उंबरठ्यावर आली असून बँकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विद्यमान अध्यक्षा श्रीमती सुमनताई शेळके व त्यांच्या स्नुषा गीतांजलीताई शेळके यांनी स्वतंत्र पॅनल दिले आहे. विद्यमान अध्यक्षा असणाऱ्या सुमनताई यांनी या निवडणुकीत मतदारांना भावनिक साद घालताना सत्या पुन्हा ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे. व्यक्तीगत त्यांच्याबाबत सभासदांमध्ये सहानुभूती असल्याचे दिसून येत असले तरी त्यांच्या आडून कामकाज पाहत आलेल्या स्मीता शेळके- पटेल यांच्या कामकाजपद्धतीने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अडीच वर्षात स्मीता शेळके – पटेल यांच्याकडून अनेकजण दुखावले गेले.
बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात देखील याबाबत स्पष्टपणे बोलले जात आहे. निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा देखील हाच झाला असल्याचे शेवटच्या टप्प्यात समोर आले.पाणी फौंडेशनच्या कामाने पिंपरी जलसेनमधील घराघरात गीतांजली शेळके या पोहचल्या! याशिवाय यानिमित्ताने पारनेर तालुक्यातील अनेक गावांशी त्यांचा संपर्क आला. हीच शिदोरी आता त्यांना कामी आली असल्याचे दिसते. सॉ. गुलाबराव शेळके यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव ॲड. उदयराव शेळके यांनी बँकेची धुरा हाती घेतली आणि बँकेत पारदश व तितकाच विश्वासपूर्वक प्रयत्न केले. बँकेची वाटचाल पाच हजार कोटींकडे होत असतानाच उदयराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि त्यातून बँकेसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. बँकेचे काय असे वाटत असतानाच संचालक मंडळाने मोठ्या हिमतीने कंबर कसली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदयरावांच्या निधनानंतर सभासद, ठेवीदार आणि कर्ज़दारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे अविश्वासाचे निर्माण झालेले मळभ दूर झाले.
बँकेत स्वीकृत संचालक होण्यापासून ते मुलींना सभासद होण्यापर्यंत झालेला अन्याय गीतांजली शेळके यांनी सभासदांसमोर मांडला. दुसरा टेबल आणि पदराआडून चालणारा कारभार, त्यातून होणारी दादागिरी, मुस्कटदाबी हे मुद्देही पुढे आले. या मुद्यांना सुमनताई अथवा स्मीताताई यांच्याकडून कोणतेच प्रभावी प्रत्युत्तर आले नाही. एकूणच गेल्या दोन- तीन आठवड्यात पारनेर, पुणे, मुंबईसह अन्यत्र गीतांजली शेळके यांनी सभासदांच्या गाठीभेठींवर भर दिला आणि त्यातूनच भावनिक साद घातली. हीच साद मतदारांना भावल्याचे दिसते. आता प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन सभासद काय भुमिका घेतात यावरच सारे काही असणार आहे.