पारनेर । नगर सहयाद्री:
कृषी विभागामार्फत योग्य समुपदेशन करत सुरु असलेल्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या राबविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी. त्यामुळे कुठल्याही योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचित राहणार नाही असे मत आ. काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेच्या तालुक्यातील ३६ लाभार्थ्यांना ७१ लाखांचे अनुदान मंजुर झाले असून या योजनेचा धनादेश प्रमाणपत्र वितरण आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष हसन राजे, उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, ॲड. युवराज पाटील, कृषी अधिकारी गजानन घुले, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते
तालुक्यातील रस्ते अपघातात, विजेच्या धक्क्याने,पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ३६ कुटुंब सानुग्रह अनुदानापासून वंचित होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, यांच्याशी पत्रव्यवहार करत भेट घेऊन तात्काळ या कुटुंबांना मदत शासनामार्फत करावी अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली.
शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी राहणार!
आमदार होण्यापूर्वी देखील सातत्याने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शेतकरी कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तींसाठी दोन लाख रुपये ही रक्कम पुरेशी नाही. मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरकारकडून त्या कुटुंबाला मदत म्हणून ही रक्कम दिली गेली आहे. या कुटुंबियांशी मी कायमच पाठीशी राहणार असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.
योजनेत बदल करण्याची आवश्यकता!
कुटुंबामध्ये जमीन जर आजोबाच्या नावावर असेल आणि त्या कुटुंबातील नातवाचे अपघाती निधन झाले तर त्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघाती निधन योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी या योजनेमध्ये धोरणात्मक बदल करणे आवश्यक असून यासंदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.