मुंबई । नगर सहयाद्री:-
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. आता या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत मृतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर निर्णयाची औपचारिक घोषणा करण्यात आली. या मदतीसोबतच राज्य सरकारकडून संबंधित कुटुंबीयांच्या शिक्षण आणि रोजगाराची जबाबदारी घेण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे. या हल्ल्यात पुण्याचे रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत जगदाळे यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कालच आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. मात्र आज मुख्यमंत्री विशेषाधिकार वापरून त्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतो, असं फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केलं. राज्य सरकारचा हा निर्णय अन्य पीडित कुटुंबीयांसाठीही आधार ठरणार आहे. या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य पातळीवर दहशतवाद्यांविरोधात निर्णायक भूमिका घेण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आलं आहे.
काश्मीरमधील 50 पर्यटनस्थळे बंद
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे. असे असताना काश्मिरमधील 50 पर्यटन स्थळे पर्यटकांसाटी बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील तब्बल 50 पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पहलगाम येथे गेल्या आठवड्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील देखील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भाने आणि खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीर सरकारने काश्मीर खोऱ्यातील जवळपास 50 पर्यटन स्थळे आणि ट्रेकिंग ट्रेल्स बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे.