मुंबई / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के इतका महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय, कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघात विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ति योजनेपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासची मुदत नऊ महिन्यांवरून 12 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णायामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पगारामुळे आणि इतर सोयी सुविधांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. सरकारने मंगळवारी या घोषणा करत गुड न्यूज दिली आहे.
एक कोटींचा अपघात विमा –
एसटी महामंडळाच्या विविध संघटनांची सह्याद्री बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये एक कोटी रूपयांच्या विम्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अपघात विमा कवच लागू करण्यासाठी बँकेशी सामंजस्य करार झाला आहे. स्टेट बँकेत वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळेल. कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघातात निधन झाल्यास एक कोटी रुपये, पूर्ण अपंगत्व आल्यास एक कोटी रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल.