पारनेर । नगर सहयाद्री :-
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून निघोज परिसरातील एकूण १४ गावांना शेतीसाठी पाणी दिले जाते. या कूकडी डावा कालव्यातून आवर्तन सोडवण्यासाठी तारखा ठरलेल्या असून २० फेब्रुवारी रोजी या कुकडी कालव्यातून पाणी सोडण्यात येणार होते. हे आवर्तन ठरलेल्या तारखेच्या अगोदर सोडावे अशी मागणी निघोज परिसरातील नागरिकांनी आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे केली होती.
आता उन्हाळी पिकांना दिवसेंदिवस पाण्याची जास्त गरज असुन पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकर्यांची अतोनात नुकसान होऊ नये यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी ठरलेल्या आवर्तनाच्या पाच दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी शिर्डी येथे सहकार परिषद मध्ये आमदार काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांचे मागणी प्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली.
आमदार दाते सर यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी तात्काळ कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता धुमाळ यांना 15 फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. शेतकर्यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी नक्कीच फायदा होणार असून पाच दिवस अगोदर आवर्तन सुटणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार काशिनाथ दाते सर यांचे आभार व्यक्त केले आहे.