मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता असून, यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारने बँकांकडून शेतकऱ्यांची थकबाकीची सविस्तर माहिती मागवली असून, संबंधित समिती ऑक्टोबर अखेर आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) अहवालानुसार, राज्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे ३५,४७७ कोटी रुपयांची कर्जथकबाकी आहे. यामुळे तब्बल २४.७३ लाख शेतकरी बँकांच्या कर्ज सुविधा मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातही सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे तब्बल ३,९७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अमरावती, बीड, बुलडाणा, नांदेड, पुणे, आणि यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर कर्ज थकले आहे.
यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यात ६९ लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिक गहिरी झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जफेड करणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची जोरदार मागणी होत आहे. फक्त बँकांचे कर्जच नव्हे, तर सुमारे १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर खासगी सावकारांचे १,५०० ते २,००० कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे असल्याचेही उघड झाले आहे.
सावकारांच्या वसुलीमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावात असून, राज्यात दररोज सरासरी सहा शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. महायुती सरकारच्या निवडणूक कार्यक्रमपत्रिकेतही कर्जमाफीचा मुद्दा होता. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी सौगात मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून, ऑक्टोबर अखेर या समितीकडून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.