Crime News : प्रेमविवाहाच्या कारणातून अहिल्यानगर जिल्ह्यात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना सोमवार दि. १७ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली. यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बारागाव नांदूर येथे दि. १७ मार्च २०२५ रोजी एक तरुण व एक तरुणी प्रेम विवाह करुन आले. त्यानंतर रात्री ८ वाजता दोन गट बारगाव नांदूर येथे समोरासमोर आले. त्यानंतर दोन गटात शिवीगाळ, दमदाटी व मारहाण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार अमित राठोड, सागर नवले, गणेश सानप, प्रमोद ढाकणे, नदीम शेख आदी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे दोन गट आरडाओरडा करुन एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करत होते.
तेव्हा पोलीस पथकाने त्यांची मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. घटनेनंतर पोलीस नाईक सागर नवले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इरफान नजिर शेख, बशिर बाबुलाल शेख, अमिर मगुबाबा शेख, सलमान महम्मोद शेख, निजाम कादर काकर, इमरान सलीम काकर, रियाज बबलु काकर, अमिर समीर काकर (सर्व रा. बारगाव नांदुर) या आठ जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १९४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.