अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने सारसनगर परिसरात डेंगू मुक्त अभियान संपन्न
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
चिकनगुनिया, हिवताप, डेंगू आणि मलेरिया हे आजार डासांमुळे होतात. सन 2023 मधील पावसाळ्यात शहरात 98 डेंगू रुग्ण आढळले होते. यामुळे डेंगूचा प्रसार टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ‘डेंगू मुक्त अहिल्यानगर’ अभियान सुरु करण्यात आले. या अंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती केली गेली. याचा परिणाम दिसून आला असून या वर्षी आतापर्यंत 8 रुग्ण आढळले आहेत, तर मागील 2024 या वर्षात 78 रुग्ण नोंदले गेले होते. गेल्या तीन वर्षांत मलेरियाचे एकही रुग्ण शहरात आढळलेले नाही.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले की, डेंगू हा आजार डासांच्या उत्पत्तीमुळे होतो आणि तो स्वच्छ पाण्यात होतो. नागरिकांनी घरात साठवलेले पाणी वेळोवेळी नष्ट करावे आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. सारसनगर परिसरातील अभियानात आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, हभप प्रभाताई भोंग, शिवाजी विधाते, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शिवाजी म्हस्के, जगन्नाथ बोडखे, डॉ. राहुल मुथा, डॉ. संदीप राऊत, डॉ. आयेशा शेख तसेच विद्यार्थी, नागरिक आणि आशा सेविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, नागरिकांच्या सहकार्याशिवाय कुठलीही योजना यशस्वी होऊ शकत नाही. महानगरपालिकेने सुरू केलेल्या डेंगू मुक्त अभियानाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सहकार्य करावे. स्वच्छतेचे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. यावेळी आशा सेविकांनी आजाराविषयी गीत सादर करून जनजागृती केली. कुमारी तनिष्का चंदेवय ६ वर्षेये या बालिकेने डासाची वेशभूषा करून आरोग्यास किती हानिकारक आहे हे सांगितले. तसेच, कुमारी अस्मिता इंगळे (वय ९) ने गणपतीच्या आरतीमध्ये संसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आयेशा शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश राजुरकर यांनी मानले.
अभियानात 100 कर्मचारी कार्यरत असून 20 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी करतात, दूषित पाणीसाठे नष्ट करतात आणि नागरिकांचे आरोग्य तपासतात. ताप असल्यास रक्ताचे नमुने घेतले जातात. आज हा अभियानाचा ११वा आठवडा असून 12,000 घरांची तपासणी करण्यात आली आहे. या घरांमधील 36,000 पाणीसाठ्याची पाहणी केली गेली, त्यातील 570 दूषित पाणीसाठे आढळून नष्ट केले गेले. आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांना आवाहन केले की, यावर्षीचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, शक्य तितके शाडू-मातीच्या गणपतींचा वापर करून आपला धार्मिक उत्सव साजरा करावा.