Maharashtra News:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे तब्बल २० वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीकडे अद्याप पक्का रस्ता नसल्याने, अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला. गावातील एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट तलाठी कार्यालयासमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
तरवाडी गावात शासनाच्या निधीतून स्मशानभूमी उभारण्यात आली असली, तरी तेथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे मृतदेह नेणे अत्यंत कठीण बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, घसरट मार्ग आणि वाहतुकीचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना पर्यायी ठिकाणं शोधावी लागतात.
गावातील एक शेतकरी निधन पावल्यावर त्यांच्या कुटुंबाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पण रस्ता नसल्याने मृतदेह नेणे अशक्य झाल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, हे ठळकपणे समोर आले आहे. रस्ता नसलेली स्मशानभूमी केवळ नावापुरती असून, ही समस्या गेली दोन दशके सुरूच आहे.